निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला.
सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.
शेणपूर, मलांजन, सामोडे आणि कासारे परिसरात पावसाने रौद्र रूप धारण केले. शेणपूर येथील डाळिंब उत्पादक आकाश काकुस्ते यांच्या ७ एकर क्षेत्रातील बागेचे अतोनात नुकसान झाले आहे.
गारांच्या मारामुळे डाळिंबाची फुले व फळे गळून पडली असून, आगामी काळात 'लाल्या' रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कासारे येथील विकास देसले यांच्या शेतातील टरबूज व पपईच्या पिकात पाणी साचल्याने नुकसान झाले.
पाल उडाले, स्वप्न भिजली
मालपूर यात्रेवर निसर्गाचा घाला पडला आहे. नदीपात्रात उभारलेली तात्पुरती हॉटेल्स, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. अनेकांचे साठवलेले खाद्यान्न आणि विक्रीचे साहित्य पावसात भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे
मालपूर यात्रेत उडाली धांदल
• शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास गारांसह पाऊस सुरू झाला. सध्या मालपूर येथे ग्रामदैवतेचा यात्रा उत्सव सुरू आहे.
• अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अमरावती नदीपात्रातील हॉटेल व्यावसायिक आणि खेळणी विक्रेत्यांचे पाल उडून मोठी धांदल उडाली.
• आश्रयासाठी जागा नसल्याने भाविक आणि व्यावसायिकांची एकच पळापळ झाली.
• शिंदखेडा तालुक्यातील सुराय, कलवाडे, अक्कलकोस, कर्ले आणि परसोळे शिवारातही गहू, मका व कांदा पिके जमीनदोस्त झाली आहेत.
शासनाने तातडीने पंचनामे करावे!
साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात बुधवारी झालेल्या भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. शेणपूर येथील ७ एकर डाळिंब बागेसह कासारे परिसरातील टरबूज व पपईची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
आनंदावर विरजण!
मालपूर ग्रामदैवतेच्या यात्रा उत्सवात अचानक पावसामुळे आनंदाचे वातावरण भीतीमध्ये बदलले. अमरावती नदीपात्रात थाटलेली दुकाने आणि पाळणे चालवणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
जगावे कसे, असा प्रश्न
नवडणे, धाडणे, देगाव, चिकसे, गव्हाणीपाडा, उंभरे आणि सायने या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. कांदा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक चितेत सापडला आहे. रब्बी हंगामाकडून असलेल्या उरल्यासुरल्या अपेक्षाही या नैसर्गिक आपत्तीमुळे फोल ठरल्या आहेत.
हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर
