कधी वादळी वारे, कधी मुसळधार पाऊस यात अनेकदा ब्रेक लागलेला यंदाचा मासेमारी हंगाम आता बंद झाला आहे. पावसाळी हंगामासाठी रविवार, १ जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद राहणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जून-जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा असतो. याचवेळी पावसामुळे समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते ३१ जुलै यादरम्यान खोल समुद्रातील मासेमारीला शासनाकडूनच बंदी घातली जाते. मच्छीमार बांधवही या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत.
या दोन महिन्यांच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती अशा प्रकारची कामे करतात. खलाशी म्हणून काम करणारे परराज्यातील, परदेशातील कामगार या काळात गावी जातात.
१५ दिवस आधीच सुरू झाली बंदी!
अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसायला लागल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीच १५ दिवस आधीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे.