रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतीसाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या काळात अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरणने प्रयत्न चालविले आहेत.
तरीही तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कृषिपंपांचे नुकसान आणि रोहित्र जळण्याचे प्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑटोस्विचचा वापर टाळून कॅपॅसिटर बसवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अनेक शेतकरी वीज येताच शेतात जाण्याचा त्रास वाचवण्यासाठी पंपांना "ऑटोस्विच" लावतात. मात्र, यामुळे वीज पुरवठा सुरू होताच परिसरातील सर्व पंप एकाच वेळी सुरू होतात.
शेतकऱ्यांनी पंपाचा वापर करताना याकडे लक्ष द्यावे
◼️ रोहित्रावर अचानक प्रचंड भार आल्या रोहित्र जळणे किंवा वीजवाहिन्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते.
◼️ शेतकऱ्यांनी ज्या पंपांचे कॅपॅसिटर बंद आहेत ते दुरुस्त करावेत आणि ज्यांनी अद्याप बसवले नाहीत त्यांनी ते तातडीने बसवून घ्यावेत.
◼️ कार्यक्षम ऊर्जा वापरासाठी कॅपॅसिटर हे अत्यंत महत्त्वाचे साधन असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
◼️ काही ठिकाणी कॅपॅसिटर असूनही ते थेट जोडलेले असतात किंवा बंद अवस्थेत असतात.
◼️ अशा स्थितीत तांत्रिक लाभ मिळत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
कॅपॅसिटरचे बहुविध फायदे
◼️ कृषिपंपाला क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे हा तांत्रिक बिघाड टाळण्याचा सोपा उपाय आहे.
◼️ कॅपॅसिटरमुळे कमी दाबाच्या समस्येपासून सुटका मिळते.
◼️ केबल जळण्याचे प्रमाण कमी होते व मोटर सुरक्षित राहते.
◼️ योग्य विद्युत दाबामुळे वीज वापरात बचत होऊन "केव्हीए" मागणी मर्यादित राहते.
◼️ शिवाय, रोहित्र जळण्याचे प्रमाण घटल्याने खंडित वीजपुरवठ्याचा त्रास वाचतो.
रब्बी हंगामात वीज वापर व भार वाढला आहे. परिणामी रोहित्र व शेती वीजवाहिन्यांवरील भार वाढून वीज वाहिनी व रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण वाढत असते. शेतकऱ्यांनी कॅपॅसिटर बसविल्यास भार नियंत्रित राहून रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी होऊ शकते.
अधिक वाचा: पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफीचा फायदा; प्रत्येक कर्ज प्रकरणामागे शेतकऱ्यांची किती रुपयांची बचत
