सोलापूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अजूनही जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांपैकी २३ साखर कारखान्यांनी जवळजवळ २७६ कोटी ८४ लाख रुपये उसाची एफआरपी थकवली असल्याची माहिती समोर आली आहे.
एफआरपीची रक्कम मिळावी, यासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाने सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाला निवेदन दिले आहे.
या निवेदनावर ऊस दर नियंत्रण मंडळाचे प्रा. सुहास पाटील, रयत क्रांतीचे युवक प्रदेशाध्यक्ष अमोल वेदपाठक, रयत क्रांतीचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांच्या सह्या आहेत.
चालू २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामामधील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे बिल दिलेले नाही. बहुतांश साखर कारखान्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची उसाची बिले शेतकऱ्यांना दिलेले आहेत.
त्यानंतर १ जानेवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची उसाची बिले कोणत्याच शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. असे असताना सर्व साखर कारखाने एफआरपी दिल्याची कागदपत्रे जाहीर करत आहेत.
ऊस दर जाहीर, अंमलबजावणी मात्र नाहीच
◼️ कारखाने ऑफिसची दिशाभूल करून शेतकऱ्यांची एफआरपी दिल्याचे दर्शवत आहेत. परंतु, शेतकऱ्यांना ऊस हंगाम संपूनही दोन महिने झाले तरीही अद्याप कसलेच उसाचे बिल मिळालेले नाही.
◼️ साखर हंगाम सुरू होत असताना, सर्व साखर कारखान्यांनी तीन हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे प्रसिद्ध माध्यमातूनही जाहीर केले होते. त्याचीही अंमलबजावणी अनेक साखर कारखान्यांनी केलेली नाही.
◼️ अशा साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशा मागणीचे निवेदन ऊस दर नियंत्रण मंडळाने दिले आहे. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.
साखर कारखान्यांचे नाव आणि थकीत एफआरपी रक्कम
कारखाना - थकीत रक्कम
सिद्धेश्वर कारखाना, कुमठे - ३८.७१ कोटी
दामाजी कारखाना - ६.२६ कोटी
कुर्मदास कारखाना - २३.३९ कोटी
लोकनेते, अनगर - ३९.४२ कोटी
सासवड माळी, माळीनगर - १५.२४ कोटी
लोकमंगल, बीबीदारफळ - १२.७३ कोटी
लोकमंगल शुगर, भंडारकवठे - ११ कोटी
ओंकार शुगर, म्हैसगाव - १४.६३ कोटी
सिद्धनाथ शुगर, तिऱ्हे - २१.२६ कोटी
जकराया शुगर, वटवटे - ११.३५ कोटी
भैरवनाथ शुगर, लवंगी - १४.८३ कोटी
इतोपियन शुगर, कचरेवाडी - ११.३८ कोटी
मातोश्री लक्ष्मी शुगर, रुद्रेवाडी - ११.१० कोटी
बबनरावजी शिंदे, तुर्क पिंपरी - ५८ लाख
जय हिंद शुगर, आचेगाव - ४.५६ कोटी
ओंकार कार्पोरेशन, तडवळ - १८.८२ कोटी
भीमा कारखाना, टाकळी - ३०.३६ कोटी
संत शिरोमणी, चंद्रभागा नगर - ६.६६ कोटी
शंकर सहकारी, सदाशिव नगर - १.३९ कोटी
अवताडे शुगर, नांदूर - १७.५६ कोटी
विठ्ठल कारखाना, गुरसाळे - ५८.५७ कोटी
कमला भवानी, पांडे - ३१.४७ कोटी
शिवगिरी अॅग्रो, विहाळ - ४.३७ कोटी
शेतकऱ्यांची कारखानदारांकडून फसवणूक
◼️ सध्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस साखर कारखान्यांकडे कागदोपत्री २७६ कोटी ८४ लाख रुपये थकीत एफआरपी असल्याचे निदर्शनास येते.
◼️ परंतु, शेतकऱ्यांचे जवळजवळ ४५० ते ५०० कोटी रुपये ऊस साखर कारखानदारांकडून येणे बाकी आहेत, असे ऊस दर नियंत्रण मंडळाने सांगितले.
अधिक वाचा: थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; आता एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरु, कुणाला होणार फायदा?
