गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे भाव सातत्याने कमी होत आहेत. कधीतरी दर चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकरीकापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. पिकवलेल्या कापसाचे दर कमी होत असले, तरी बाजारात उपलब्ध झालेल्या कापसाच्या बियाणाचे दर मात्र सातत्याने वाढत आहेत.
कापसाचा भाव ६५०० ते ७००० रुपये क्विंटल आहे, तर बियाणांच्या पाकिटाची किंमत ९०१ रुपयांवर गेली आहे. बियाणाच्या पाकिटात २०२३ मध्ये ४३ रुपये, २०२४ मध्ये ११ रुपयांनी वाढ झाली होती, तर यंदा सुमारे ३७ रुपयांनी वाढ झाली आहे. दोन वर्षापासून बी-बियाणे किमतींमध्येदेखील मोठी वाढ झाली आहे.
यंदा गरज नसतानादेखील कापसाच्या बियाणामध्ये शासनाकडून वाढ करण्यात आली. सरकारने ४७५ ग्रॅमच्या पाकिटाच्या दरात गेल्या दोन हंगामापासून, तर ई यंदापर्यंत तब्बल ९१ रुपयांची वाढ केली आहे. आता बियाणाच्या पाकिटाचा भाव ९०१ रुपयांवर गेला आहे.
एकरी खर्चात वाढ
• एक एकर कापूस लागवडीसाठी दोन पाकिटांची गरज असते. पण, दिवसेंदिवस एकरी उत्पादन घटत आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे.
• त्यातच आता बियाणे दरवाढीचा बोजा पडणार, एकीकडे उत्पादन घटूनही भाव नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सरकार दरवाढ करीत आहे.
विविध खतांमध्ये यंदा झाली अशी दरवाढ
खत | पूर्वीचे दर | सध्याचे दर |
१०:२६:२६ | १४७० | १७२० |
१८:१८:१० | १२०० | १३०० |
२०:२०:००:१३ | १२५० | १३५० |
१२:३२:१६ | १४७० | १७५० |
१५:१५:१५ | १४७० | १६५० |
१६:१६:१६ | १४५० | १४७५ |
१९:१९:१९ | १६०० | १८५० |
खर्चाचा ताळमेळ साधणार कसा; शेतकरी हवालदिल
यंदा खतांसह बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, याचबरोबरच विविध औषधांच्याही गगनाला भिडलेल्या किमती, मजुरीचे दर आणि एवढे केल्यानंतरही पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने खर्च आणि विक्री याचा ताळमेळ साधणार कसा? या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाला आहे. वाढत्या खर्चाचा सामना करत असतानाच अलिकडे नैसर्गिक संकटांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे या साऱ्यांचा सामना करणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे.
अगोदरच खते, औषधांमध्ये भरमसाठ वाढ केली असून, शेती लागवडीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या बियाणात वाढ करून कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे. - सुनील भिलखेडे, शेतकरी, वाकोद जि. जळगाव.
शासनाकडून बियाणे किमतीत भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरवर्षी ही वाढ होत आहे. तसेच खतांच्या भाववाढीमुळेदेखील कृषी निविष्ठा विक्रेत्याचेही आर्थिक बजेट कोलमडत आहे. शासनाने बियाण्यांसह खताचे दर कमी करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची तसेच आम्हा विक्रेत्यांचीदेखील आहे. - अजय लोढा, कृषी निविष्ठा विक्रेते.
खताच्या किमतीतदेखील झाली वाढ..!
• खताच्या किमतीतदेखील मोठी वाढ यंद पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा आवश्यक असलेल्या युरियाव्यतिरिक्त जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे.
• १०:२६:२६ या खताच्या किमतीत यंदा अडीचशे रुपयांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. पूर्वी या खताची एक बॅग १४७० रुपयांना मिळत होती, ती यंदा १७२० रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे.
• जवळपास सर्वच रासायनिक खतांच्या किमती सरासरी १०० रुपयांनी तर काही खतांच्या किमती २०० ते २५० रुपयांनी वाढल्या आहेत.