पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभदेताना ओळख क्रमांक बंधनकारक केले आहे. लाभार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत राज्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांना क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
पुढील टप्प्यात थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करता येणार
◼️ शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधार क्रमांकाशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात अॅग्रिस्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे.
◼️ यासाठी राज्यभरातील तलाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देत आहेत.
◼️ या जोडीला आता सामायिक सुविधा केंद्रांमधूनही शेतकरी ओळख क्रमांक करून घेत आहेत.
◼️ भूमी अभिलेख विभागाने यापुढील टप्प्यात आता थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
◼️ त्यानुसार अॅग्रिस्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे.
◼️ राज्यात या योजनेत आतापर्यंत २१ लाख ७० हजार ४१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
◼️ त्यापैकी २१ लाख ६८ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
◼️ पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना हा ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे.
◼️ त्यानुसार या लाभार्थ्यांची तुलना केल्यास राज्यात ७५ टक्के शेतकऱ्यांना क्रमांक मिळाला आहे.
अहिल्यानगर ठरले अग्रेसर
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख १ हजार १६१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहेत. या जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ७ लाख ११ हजार ५५२ लाभार्थी असून ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
विभागनिहाय ओळख क्रमांक
पुणे - २१,७१,०९०
नाशिक - १७,८५,४५४
संभाजीनगर - २२,९७,५८२
अमरावती - १२,७७,८९४
नागपूर - ११,३४,०७६
कोकण - ५,०२,२२०
मुंबई - ३२३
एकूण - ९१,६८,६३९
राज्याने अॅग्रिस्टँक योजनेत ओळख क्रमांक देण्याचा मोठा टप्पा ओलांडला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही ओळख क्रमांक देण्याचे काम वेगाने सुरू आहे. - डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक
अधिक वाचा: पशुसंवर्धन विभागात या पदासाठी मोठी भरती; २७९५ रिक्त पदे लवकरच भरणार