नितीन कांबळे
शेतकऱ्याने कांद्याचे बियाणे खरेदी करत १५ गुंठे शेतात कांद्याची लागवड केली खरी; परंतु कांद्याची उगवण होऊन केवळ वरच्या बाजूला फुले डोंगळा आल्याचा प्रकार बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे समोर आला आहे. या प्रकरणी कृषी विक्रेत्याकडून फसवणूक झाल्याची तक्रार शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केली आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी भगवान बापू पोकळे यांनी गावातील बालाजी एजन्सी येथून २ ऑक्टोबर २०२५ रोजी २ हजार ३५० रुपये किमतीचे सिद्धान्त कंपनीचे दोन पुडे कांदा बियाणे खरेदी करत ट्रॅक्टरने पेरणी केली. मात्र बियाणे काही ठिकाणी उगवले, तर काही ठिकाणी उगवलेच नाही.
त्यांनी आलेले पीक उपटून मजुराच्या माध्यमातून दुसरीकडे लागवड केली. खत, फवारणी, पाणी अशी मेहनत केली; परंतु बियाण्याला कांदा येण्याऐवजी चक्क फुले आली म्हणजे डोंगळा लागला. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, कंपनीसह एजन्सीचालकाचा बेजबाबदारपणा समोर आला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी भगवान पोकळे यांनी केली आहे.
कंपनीने बियाणे जमा करून घेतले नाहीत
सप्टेंबर २०२५ रोजी सदरील कंपनीने शिल्लक बियाणे परत करण्यासाठी संबंधित एजन्सीला व कृषी सेवा दुकानदाराला सूचना देऊन ते शिल्लक बियाणे कंपनीकडे जमा करून घेतले जाते.
कांद्याचा डेंगळा होऊन नुकसान झाले
माझे आर्थिक नुकसान झाले असून कंपनीसह एजन्सी मालकही जबाबदार असून नुकसानभरपाई त्वरित मिळावी. नसता मी कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे शेतकरी भगवान पोकळे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी
कांद्याच्या बियाण्यांच्या बाबतीत अशा प्रकारे जर फसवणूक झाली असेल तर शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी, असे आष्टीचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
