नितीन चौधरी
पुणे : राज्यात एप्रिल व मे या दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ९३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाकडून प्रत्येक महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे सादर केला जातो. मात्र, एप्रिलचा अहवाल अद्यापही सादर झालेला नाही.
त्यामुळे मे महिन्याचा अहवाल त्यानंतरच सादर होईल हे स्पष्ट झाले आहे, या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अहवाल सादर झाल्यानंतरच महसूल विभागाकडून नुकसान भरपाईसंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येईल.
त्यानंतरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल असे चित्र आहे. केवळ पाच ते सहा जिल्ह्यांमधूनच नुकसानीचा 'अबकड' अंतिम अहवाल कृषी आयुक्तालयापर्यंत पोहोचला आहे. अन्य जिल्ह्यांत एप्रिल अखेर व 'मे'च्या सुरुवातीपासून अवकाळीने पुन्हा नुकसान झाले.
एप्रिलमध्ये २८ हजार हेक्टर बाधित
- राज्यात मार्चचा अखेरचा आठवडा आणि एप्रिलचे पहिले दोन आठवडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.
- यामुळे राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील २८ हजार ३५२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
- यात प्रामुख्याने गहू, हरभरा, मका या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
- सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात ५ हजार ८२१ हेक्टरचे, तर त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यात ५ हजार २५२ हेक्टरचे झाले होते.
- या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून अद्यापही सुरू असल्याचे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
- केवळ पाच ते सहा जिल्ह्यांमधूनच नुकसानीचा 'अबकड' अंतिम अहवाल कृषी आयुक्तालय कार्यालयापर्यंत पोहोचला आहे.
- अन्य जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या अखेर व 'मे'च्या सुरुवातीपासून अवकाळीने पुन्हा नुकसान झाल्याने पंचनाम्याचे काम सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.
'मे'मध्ये ६४ हजार हेक्टरचे नुकसान
- त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सबंध मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाने शेतातील उभ्या पिकांना फटका दिला. त्यात राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये एकूण ६४ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
- यात प्रामुख्याने भाजीपाला, फळपिके, मका, ज्वारी, बाजरी, आंबा या पिकांचा समावेश आहे.
- अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १४ हजार २८९, तर त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यात १४ हजार २१६ हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
- त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातही अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरूच आहे.
- ज्या ठिकाणी पाऊस थांबला आहे, अशा ठिकाणचे पंचनामे पुढील तीन ते चार दिवसांत पूर्ण होऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
ऑक्टोबर २०२४ पर्यंतची मदत जमा
- यापूर्वी राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६४० कोटी ४७ लाखांचा निधी वितरित केला होता, त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या काळासाठी ५२० कोटी १५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले होते.
- एप्रिल व मे दोन महिन्यांमध्ये राज्यातील ९३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतीचा आकडादेखील मोठा असण्याची शक्यता आहे. यासाठी मात्र अहवालाची प्रतीक्षा आहे.
अद्याप अहवालच नाही
१) जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर विभागीय आयुक्तांकडे नुकसानभरपाईचा अहवाल सादर केला जातो. विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे यासंदर्भात मदतीची मागणी केली जाते.
२) यानंतर राज्य सरकारचा मदत व पुनर्वसन विभाग मदत जाहीर करतो; परंतु एप्रिलवा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणान्या मदतीसंदर्भात मदत व पुनर्वसन विभाग अद्याप निर्णय घेऊ शकलेला नाही.
३) दुसरीकडे शेतातील अभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, तर अहवाल गेल्यानंतरच मदत मिळणार असल्याने अहवाल नेमका केव्हा जाईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यात खरीप पेरणीला सुरवात; कोणत्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती?