ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे.
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करुन, रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
सध्या खरीप हंगामातील पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अॅप अपडेट करुन घ्यावे.
खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरु राहणार आहे.
तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी १५ सप्टेंबर २०२५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी.
पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील.
तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी खरीप २०२५ ची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी.
अधिक वाचा: ऊस लागवड करताय? ८६०३२ पेक्षा जास्त उत्पादन व साखर उतारा देणारी 'ही' जात निवडा