कोल्हापूर : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
या शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांची ९९ लाख १८ हजार २१० इतकी रक्कम अजूनही जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदा मेमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने गेल्यावर्षीच्या नुकसानीचे किती पैसे मिळाले याची माहिती घेतली. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यानंतर तातडीने पंचनामे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकसानभरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे.
मात्र अजूनही १ हजार ९९२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. तोपर्यंत नव्या वर्षातील पावसाळा सुरू झाला आहे.
म्हणून ई-केवायसी नाही
- ई-केवायसी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबरला जोडून घ्यायचे आहे.
- पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही.
- काही जणांचा आधार नंबर चुकला आहे तर काही जणांचे बँक खाते क्रमांक चुकले आहे.
- दुरुस्तीचे अर्ज देऊनही ते अपडेट झालेले नाही.
अशा कारणांमुळे ई-केवायसी योग्य झालेली नाही, त्यामुळे रक्कम मिळाली नाही असे त्रांगडे आहे.
दृष्टिक्षेपात नुकसानभरपाई
बाधित शेतकरी : १ लाख ०८ हजार ८२९
जिल्ह्याला मिळालेली रक्कम : १२२ कोटी ४२ लाख ३७ हजार
मंजूर रक्कम : २४ कोटी ५२ लाख १९ हजार ५३३
खात्यावर जमा झालेली रक्कम : २१ कोटी ६८ लाख ८८ हजार ७६८
ई-केवायसी प्रलंबित शेतकरी : १ हजार ९९२
प्रलंबित रक्कम : ९९ लाख १८ हजार २१०
अधिक वाचा: सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पेरणी अगोदर करायला विसरू नका ह्या १० गोष्टी