उद्धव गोडसे
वळवाच्या पावसानंतर शेताची मशागत सुरू होताच शिवारात सापांचा वावर वाढतो. कामाच्या घाईत दुर्लक्ष होऊन सर्पदंशाच्या घटना वाढतात, वेळीच उपचार मिळाले नाहीत तर शेतकऱ्यांवर जीव गमावण्याची वेळ येते.
सर्पदंशाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घेणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. तसेच दंश झाल्यानंतर प्रथमोपचार करणे खूप गरजेचे असल्याचे सर्पमित्रांकडून सांगितले जाते.
वळीव पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीसाठी शेत तयार करून ठेवण्याची लगबग सुरू होते. शेतातील तण, पालापाचोळा, दगड-गोटे काढणे. बांधावरील झुडपे काढून स्वच्छता केली जाते. याशिवाय जनावरांचे गोठे, शेतीची अवजारे ठेवलेल्या ठिकाणांची अडगळ काढण्याचे काम सुरू होते.
पावसाळ्यासाठी सरपण साठवून ठेवण्याचीही लगबग सुरू असते. शेतात आणि अडगळीच्या ठिकाणी माणसांचा वावर वाढताच लपलेले साप, विंचू बाहेर पडतात. कामाच्या घाईत लपलेले साप दिसत नाहीत. त्याचवेळी त्यांच्याकडून शेतकऱ्यांना दंश होतो.
पावसाचे पाणी विळांमध्ये गेल्यामुळे बाहेर पडलेले साप घरांमध्ये अथवा घरातील अडगळीच्या ठिकाणी आसरा शोधण्याच्या प्रयत्नात असतात. अशावेळी घरातही सर्पदंशाच्या घटना घडतात. नाग, घोणस, मण्यार, फुरशे यासारख्या विषारी सापांचा दंश जीवघेणा ठरतो.
मे ते ऑक्टोबरदरम्यान सर्वाधिक धोका
मे आणि जून महिन्यांत शेतीच्या कामांसाठी शिवारात शेतकऱ्यांची वर्दळ असते. याच काळात पावसामुळे सापांचाही वावर वाढलेला असतो. त्यामुळे पुढे ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्पदंशाच्या घटना वाढतात अशी माहिती कोल्हापूरचे सर्पमित्र धनंजय जोशी यांनी दिली.
अशी घ्या खबरदारी...
• शेतात काम करताना, फिरताना गमबूट वापरावेत.
• अडगळीच्या जागी जाताना जमिनीवर पाय आपटावेत.
• गवत कापण्यापूर्वी परिसराचा अंदाज घ्यावा.
• घरात साफसफाई करताना अडगळीच्या जागी खबरदारी घ्यावी.
• सर्पदंश होताच जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा.
• नाग, घोणस, मण्यार वगळता इतर साप बिनविषारी असतात. त्यामुळे सर्पदंश होताच घाबरून जाऊ नये.
हेही वाचा : आधुनिक पीक पद्धतींना सेंद्रिय जोड देत फळ शेतीत गोविंदरावांनी साधली किमया भारी