शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना कीड व्यवस्थापनात पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब महत्त्वाचा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’अंतर्गत सुरू असलेल्या विशेष डिजिटलशेतीशाळा मालिकेतील तिसरे सत्र १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
कृषी विभाग, पानी फाउंडेशन आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शेतीशाळेत ‘पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
पक्षी थांबे, चिकट सापळे, कामगंध सापळे, तसेच मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या उपायांद्वारे कीड नियंत्रण कसे साधता येईल, यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्चात बचत आणि मृदास्वास्थ्य जपण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिल्या दोन डिजिटल शेतीशाळांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धती, बीज उगवण क्षमता चाचणी आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात ८५००० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
८ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या सत्रात जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादनावर भर देत बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले.
१,००,१०८ हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला, ही या उपक्रमाची मोठी यशोगाथा ठरली आहे. चौथी शेतीशाळा २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्रावर होणार आहे.
या मालिकेतील सत्रांमध्ये कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सहभाग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तत्काळ मिळणारी उत्तरे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी मांडलेले प्रत्यक्ष अनुभव यामुळे संवादात्मक व उपयुक्त अशी शिकण्याची प्रभावी प्रक्रिया घडताना दिसून आली आहे.
सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे.
शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
अधिक वाचा: आरोग्यासाठी भारी ठरणाऱ्या ज्वारीचे दर आता गव्हापेक्षा वर; वाचा क्विंटलला काय मिळतोय दर?
