गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील कांदा, भाजीपाला अशा नगदी पिकांचे नुकसान झाले आहेच याशिवाय प्रक्रिया उद्योगांचीही वाताहत झाली आहे. यावर्षी उशिराने उभारी घेतलेल्या बेदाणा उद्योग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.
निफाड तालुक्यातील शिवरे, नांदूर मध्यमेश्वर रोडवर दिंडोरी (तास) शिवारात वादळी वाऱ्याने कोसळलेल्या बेदाणा शेडच्या बाहेर ओला झालेला अर्धवट तयार बेदाणा कॅरेट मध्ये भरून रचण्याचे काम सुरू होते.
तीन दिवस सतत झालेल्या पावसाने बुलढाणा येथून दिंडोरी (तास) येथे चार महिन्याच्या हंगामासाठी दाखल झालेले बेदाणा उत्पादक शब्बीर शेख यांनी मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. हीच परिस्थिती इतर ठिकाणी नुकसान झालेल्या असणाऱ्या बेदाणा व्यावसायिकांची आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळ वारा आणि मुसळधार पाऊस, यामुळे बेदाणा शेड कोसळले, शिवाय वाळण्यासाठी उन्हामध्ये ठेवलेले बेदाणा रोज होत असलेल्या पावसाने भिजले आहेत.
त्यामुळे बेदाणा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. ऊन पडताच बेदाणा ठेवलेले ताडपत्री उघडे करणे आणि पाऊस येताच पुन्हा झाकणे या कामात अतिरिक्त मेहनत करण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.
बाहेर वाळण्यासाठी टाकलेला बेदाणा पूर्णपणे खराब झाला आहे. यावर्षी १ किलो बेदाणा तयार करायला किमान १९० ते २०० रुपये खर्च आला. शेवटच्या टप्प्यात माल भिजल्याने तो वाया जाणार आहे.
'या' भागातील बेदाणा उत्पादकांचे नुकसान
५ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिंपळगाव, पालखेड, सुकेने, दिंडोरी तास, मुखेड, नांदूर मध्यमेश्वर या भागातील बेदाणा उत्पादकांचे शेड कोसळून, बेदाणा भिजून कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या २० ते २१ वर्षांपासून मी दरवर्षी मी बुलढाणा येथून निफाड तालुक्यात बेदाणा उद्योग व्यवसाय करण्यासाठी येतो. दर हंगामात अंदाजे ५०० क्विंटल पर्यंत बेदाणा माल तयार करतो. यावर्षी २५० क्विंटल बेदाणा माल करू शकलो. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेड कोसळून माल खराब झाल्याने २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ओल्या मालाला बुरशी लागण्याचा धोका वाढला आहे. - शब्बीर शेख, बेदाणा उत्पादक.
हेही वाचा : तुम्ही पित असलेल्या पाण्याचा टीडीएस योग्य नसेल तर उद्भवू शकतो आजार? वाचा सविस्तर