कोकण हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या पश्चिम भागातील अरुंद किनारपट्टी पट्टा आहे. जो पूर्वेला सह्याद्री पर्वतरांगा आणि पश्चिमेला अथांग पसरलेल्या अरबी समुद्राने वेढलेला आहे. कमी उंचीचे सखल मैदान, डोंगर दरे, बेसॉल्ट आणि लेटेराइट खडक यामुळे हा प्रदेश डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे.
ज्यामुळे अवकाळी पावसासारख्या हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम होतो. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारची वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली की कोकणात अवकाळी डोकावतो. लहरी हवामानाच्या या प्रदेशात येथील आंबा, काजू, नारळ, भात सारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.
अलिकडच्या काही वर्षात ज्या प्रमाणात या भागात वर्षातील आठ ते दहा महिने पाऊस पडतो. तर प्रामुख्याने पिकांनी फळधारणा होण्यासाठी आवश्यक थंडी पडताना दिसत नाही. परिणामी निसर्गाच्या या दृष्टचक्रात येथील शेतकरी, बागायतदार भरडला जात असून वर्षागणिक शेती आणि बागायतीच्या क्षेत्रात कमालीची घट होताना दिसत आहे.
आंबा, काजू, नारळ आणि सुपारी ही पिके बदलत्या हवामानामुळे विविध प्रकारे प्रभावित होत आहेत, ज्यात फुलोऱ्यांमधील व्यत्यय, उत्पादनातील घट आणि रोग-कीड वाढ यांचा समावेश आहे. फळपिकांना कमी थंडीमुळे फुलोऱ्यांमध्ये व्यत्यय येतो, कारण या पिकांसाठी हिवाळ्यातील शीतल तापमान आवश्यक असते जे फुलकळी आणि फळधारणेसाठी परिपक्व करते.
हवामान बदलाने भातशेती पाण्याखाली जाऊनही ते नव्या उभारीने पुढे जातात, जरी काही ठिकाणी कर्ज ताणामुळे अपवादात्मक आत्महत्या घडल्या असतील. कोकणातील अनियमित हवामान, विशेषतः अवकाळी पावसामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.
नारळ आणि सुपारीवर अवकाळी पाऊस, दाट धुके आणि प्रदूषणाचा परिणाम होतो, ज्यामुळे बहरलेल्या मोहऱ्यांवर राखेसारखा थर जमा होतो आणि उत्पादन धोक्यात येते. कोकणात हवामान बदलामुळे या पिकांना सतत फटका बसत असून, काही भागांत उत्पादनात घट होणार अपेक्षित आहे.
दाट धुक्याचा मोहरावर परिणाम
उच्च तापमान, अवकाळी पाऊस आणि थंडीचा असमतोल यामुळे आंब्याचे प्रजनन कलिका वनस्पती कलिकांमध्ये बदलतात, फुलोऱ्यांमध्ये अनेकदा व्यत्यय येतो आणि फळांचे उत्पादन १० टक्केपर्यंत खाली येत आहे. ढगाळ हवामान आणि दाट धुके यामुळे मोहर सुकून पडतात, तर वाढत्या उष्णतेमुळे फळे ढागाळत आहेत.
कोकणातील शेतकऱ्यांचे धैर्य
• नुकसान होऊनही शेतकरी शासनाकडे मदत मागत नाहीत किंवा माध्यमांसमोर आक्रोश करत नाहीतः ते पुन्हा उभे राहतात आणि कष्टाने शेती सावरतात, जसे भात, आंबा, काजू, नारळ-सुपारी पिकांच्या नुकसानीनंतर दिसते.
• कर्जबाजारीपणा कमी असल्याने आत्महत्या दुर्मीळ आहेत, मराठवाडा-विदर्भापेक्षा वेगळी परिस्थिती येथे दिसून येते.
• कोकणातील शेतकरी बदलत्या हवामान, अतिवृष्टी, हत्ती उपद्रव आणि पिकांच्या नुकसानीला तोंड देऊनही धैर्याने आणि स्वाभिमानाने शेती करतात, कर्जाच्या ओझ्याखाली येत नाहीत आणि संघटित आंदोलने टाळतात.
पावटा, तूर पिकांची पेरणी रखडली
• काजूसाठी आवश्यक असलेल्या शीतल हिवाळ्याऐवजी वाढलेल्या तापमानामुळे फुलोऱ्या कमी होतात, फळांचे धारण कमी होते आणि उत्पादनात ५० टक्केपर्यंत घट होते. अवकाळी पाऊस आणि जास्त ओलावा यामुळे कीड-रोग वाढतात, ज्यामुळे काजू आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
• नोव्हेंबर २०२५ मध्ये कोकणातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने शेकडो हेक्टर भातशेती उद्ध्वस्त झाली, ज्यात रोपे चिखलात तुटली आणि कापलेली भात शेतातच सडले.
• शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान नोंदले गेले. शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे वर्षभराचा तांदूळ साठा धोक्यात आला असून, पावटा, तूर सारख्या पिकांची पेरणीही रखडली आहे.
महेश सरनाईक उपमुख्य उपसंपादक, सिंधुदुर्ग.
Web Summary : Konkan agriculture faces climate change impacts. Erratic weather hurts mango, cashew, coconut, and paddy crops. Unseasonal rains and lack of cold affect flowering and yields. Farmers bravely persevere despite losses.
Web Summary : कोंकण की खेती जलवायु परिवर्तन से प्रभावित है। अनियमित मौसम से आम, काजू, नारियल और धान की फसलें प्रभावित होती हैं। बेमौसम बारिश और ठंड की कमी से फूल और उपज प्रभावित होती है। नुकसान के बावजूद किसान बहादुरी से लगे हुए हैं।