निखिल म्हात्रे
अलिबाग: वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे.
१५-२० वर्षापूर्वी १ लाख २४ हजार हेक्टर असणारे क्षेत्र आता ९५ हजार ६४५ हेक्टरवर आले आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्प, फार्म हाऊस आणि अन्य विकासकामांमुळे हा शेतीवर झालेला आघात आहे.
रायगड जिल्हा हा महानगरी मुंबईच्या निकट असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होत आहे. पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आता औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखण्याच्या वाटेवर आहे.
यावर्षी ८१ हजार ३३५ हेक्टवर भात पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. त्यावरून लागवडीखालील क्षेत्रात आणखी घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतजमिनी उद्योगांच्या नावाखाली संपादित केल्या जात आहेत.
अलिबागला पसंती
अलिबागमध्ये टाटा पॉवरसाठी, रिलायन्स आणि जेएसडब्ल्यू कंपन्यांसाठी पेण तालुक्यात जागा खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सिडकोच्या माध्यमातून अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यातील ४४ गावांत एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात कुठे किती जमिनीवर घाला?
दिल्ली - मुंबई कॉरीडोर, तिसरी मुंबईसारख्या प्रकल्पाच्या चाहुलीमुळे सध्या अनेक गुंतवणूकदार रायगड जिल्ह्यातील जमिनी खरेदी करत आहेत.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ४५० हेक्टर
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी २८ हेक्टर
दिल्ली - मुंबई कॉरीडोरसाठी ४ हजार हेक्टर
डेडीकेटेड फ्रिट कॉरीडोरसाठी १० हेक्टर
बाळगंगा धरण प्रकल्पासाठी १ हजार २१३ हेक्टर
खालापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा २ साठी २ हेक्टर, तर टप्पा तीनसाठी २ हेक्टर
नवी मुंबई विमानतळासाठी ६८४ हेक्टर
रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी ३१ हेक्टर
वडोदरा - मुंबई दृतगती मार्गासाठी ३१८ हेक्टर
पुणे - दिघी रस्त्यासाठी ४ हेक्टर भूसंपादन प्रक्रिया झाली आहे. आणखी काही प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित आहेत.
खाऱ्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त
१) जिल्ह्यात खारभूमी क्षेत्रात येणारे ३१ हजार २९६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील अलिबाग तालुक्यातील ३ हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र खाड्यांमधील उधाणाचे पाणी शिरून कायमचे नापिक झाले.
२) भाताचे उत्पादन निघणाऱ्या शेतजमिनीत कांदळवणे तयार झाली आहेत. समुद्राच्या खान्य पाण्यापासून शेतजमिनींचे संरक्षण व्हावे, यासाठी खाडी आणि समुद्र किनाऱ्यांवर खारबंदिस्ती घातली जाते.
३) खारभूमी विभागाकडून त्यांची योग्य देखभाल दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे बंधारे फुटून खारे पाणी शेतात शिरते. या जमिनी नापिक होत असल्याचे चित्र आहे.
४) मागील काही वर्षात १ लाख २४ हजार हेक्टर असणारे क्षेत्र आता २५ हजारपर्यंत पोहचते आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणत घट झाल्याचे दिसून येत आहे. भविष्यात हे संकट आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.
भातशेती वाचविण्यासाठी आम्ही कृषी विभागामार्फत विविध प्रयत्न करीत आहोत. भात शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर व्हावा दृष्टीने योजना राबवल्या जात आहेत. याशिवाय पडीक जमिनीवर नरेगा अंतर्गत बांबू लागवड तसेच फळबाग लागवड बाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. - वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक
अधिक वाचा: पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज