सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी स्वतःचा पुरेसा ऊस उपलब्ध असतानाही, इतर साखर कारखान्यांकडून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात थेट घुसखोरी सुरू झाल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे सख्खा शेजारी असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने अलीकडच्या अनेक वर्षात प्रथमच सर्व अलिखित संकेत धुडकावून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात दहा ते बारा ऊसतोड टोळ्या पाठवल्याचा आरोप होत आहे.
यामुळे आतापर्यंत जपली गेलेली निकोप स्पर्धा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, काही कारखान्यांनी क्षमतेचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण केले आहे.
परिणामी पुणे जिल्ह्यासह सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ वाढली आहे. या स्पर्धेत अनेक कारखाने थेट पुणे जिल्ह्यातील ऊस पळवत असल्याचे चित्र आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमा राबवत सिंचन योजनांच्या माध्यमातून ऊस क्षेत्रात लक्षणीय वाढ केली. उपलब्ध ऊस क्षेत्राचा अभ्यास करून कारखान्याने योग्य ते विस्तारीकरण केले आहे.
सध्याच्या हंगामात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप चालेल आणि १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोमेश्वरची पहिली उचल टनाला ३३०० रुपये असून, अंतिम दर उच्चांकी राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
मात्र, जिराईत भागातील काही शेतकरी ऊसतोडीची घाई करत माळेगाव कारखान्याकडे ऊस देऊ लागल्याचे चित्र आहे.
मोरगाव, सुपे, जेजुरी या पट्ट्यात माळेगाव कारखान्याने परवानगीशिवाय टोळ्या व वाहने उतरवल्याचा आरोप सोमेश्वर व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती हे कारखाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन दशके परस्पर समन्वयाने काम करत आहेत.
आमच्यात काही अलिखित करार व संकेत आहेत. त्यानुसार परवानगी किंवा कराराशिवाय एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस न नेण्याचे समान धोरण आहे.
स्पर्धा दराची, उताऱ्याची व गाळपाची असावी. मात्र, ती निकोप असली पाहिजे. दुर्दैवाने माळेगावच्या काही टोळ्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडत आहेत.
ऊस पळवण्याचे प्रकार होणे दुर्दैवी
◼️ सोमेश्वर साखर कारखाना १ फेब्रुवारीपासून पहिली उचल टनाला ३४०० रुपये, तर १ मार्चपासून ३५०० रुपये प्रतिटन देणार आहे.
◼️ शिवाय अंतिम दर दिवाळीत उच्चांकी दिला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. दरम्यान, कराराशिवाय असे प्रकार घडने हे दुर्दैवी आहे.
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
