शेषराव वायाळ
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने बिळातील साप आता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उघड्यावर साप दिसण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्या सुगीचे दिवस सुरू असून, गहू, हरभरा, ज्वारी आदी रब्बी पिकांच्या काढणीत शेतकरी व्यस्त आहेत. पिकांची काढणी सुरू असल्याने शेत मोकळी होत असून, बिळेही उघडी पडत आहेत.
दरम्यान, उन्हाचा पारा वाढल्याने जमिनीचे तापमानही वाढले आहे. त्यामुळे बिळातील उष्णता वाढून साप बाहेर येत आहेत. शेतात शेतकऱ्यांसह मजूर काम करत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सर्वच साप विषारी नसतात; मात्र, अनेकांना विषारी व बिनविषारी सापांमधील फरक समजत नाही. त्यामुळे घाबरण्याऐवजी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सध्या उष्णतेमुळे साप बिळाबाहेर येत असून, शेतात काम करताना काळजी घ्यावी. - विशाल सोनपसारे, सर्पमित्र, परतूर जि. जालना.
सापदंश झाल्यास तंत्र-मंत्र किंवा खासगी उताऱ्याच्या नादी न लागता त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी यावे. रुग्णालयात सापदंशावरील आवश्यक लस व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. वेळेवर उपचार घेतल्यास जीवाला कोणताही धोका नसतो. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना पायात संरक्षणात्मक साधने वापरावीत व सतर्क राहावे. - डॉ. लक्ष्मण दुर्गावाड, वैद्यकीय अधीक्षक.
कडक उन्हामुळे बामणी शिवारात आढळला कोब्रा नाग
वाढत्या उन्हामुळे बामणी शिवारात कोब्रा नाग दिसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुगीच्या काळात शेतकऱ्यांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. कडक उन्ह जाणवू लागल्याने साप बिळाबाहेर पडून थंडीचा आसरा शोधत आहे.
हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर
