Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Advisory : हवामानानुसार असे करा पिकांचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 12:34 IST

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. जाणून घेऊयात पिक निहाय माहिती सविस्तर (Agriculture Advisory)

Agriculture Advisory : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. जाणून घेऊयात पिक निहाय माहिती सविस्तर

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या पाच दिवसात आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २८ नोव्हेंबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी असेल २९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबरदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे तर सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.

संदेश : पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

* वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पूर्ण फुटलेल्या बोंडातील कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी, जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.

* तुर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के  ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनुसार हलके पाणी द्यावे.

* रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के  ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

* बागायती गहू उशीरा पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. गहू पिकाची पेरणी करून २१ दिवस झाले असल्यास गहू पिकास हलके पाणी द्यावे.

* रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबरपर्यंत करता येते पेरणी ६०X३० सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.  मका पेरणी करतांना ७५ किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि ७५ किलो नत्र पेरणीनंतर एक महीन्यांनी द्यावे, याकरिता २८९ किलो १०:२६:२६  + युरिया १०० किलो किंवा ५०० किलो १५:१५:१५ किंवा ३७५ किलो  २०:२०:००:१३ किंवा युरिया १६३ किलो + ४६९ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १२६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि १६३ किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महिन्यांनी द्यावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

* सध्या किमान तापमानात झालेल्या घटमुळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून बागेस सकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. केळी बागेस ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये.

* आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

* द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड १० मिली प्रति लिटर (१० पीपीएम) पाण्याच्या द्रावणात बुडवावेत.

* पुर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

* रब्बी हंगामात लागवड केलेला भाजीपाला पिकात खुरपणी करून पीक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.

फुलशेती

* फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

* थंडीपासून/ वाऱ्यापासून पशुधनाच्या संरक्षणासाठी खिडकी व दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड / पेंढा/ मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा. दिवसा सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे.(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनपीकहवामानमराठवाडा