अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुराने पाण्याने २७६ गावांतील १ हजार ८१६ विहिरींचे नुकसान झाले होते. प्रशासनाने नुकसानग्रस्त विहिरींचे पंचनामे करून राज्य सरकारला अहवाल पाठविला होता.
या विहिरींसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे २७२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा रोजगार हमी विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात नगर, नेवासा, पारनेर, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेडसह राहाता आणि अन्य तालुक्यांत सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
यादरम्यान, जिल्ह्यातील १३४ पैकी १०० हून अधिक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. यामुळे सीना, मुळा, प्रवरा, खैरी, कुकडी, विंचरणा, आढळासह इतर नद्यांना पूर आले होते.
या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांसह विहिरींना मोठा फटका बसला होता. पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता.
शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. अतिवृष्टी आणि पुरात नुकसान झालेल्या विहिरींचे जिल्हा प्रशासन, कृषी, महसूल विभागाच्या वतीने संयुक्त पंचनामे करण्यात आले होते.
यानंतर आता बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे २७२ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला आहे.
अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?
