Join us

सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन; हंगाम लवकर संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2023 3:33 PM

साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील.

साखर हंगामाला सव्वा महिना उलटला असून, १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याने घट झाली. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक नोव्हेंबरला ऊस गाळपाचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यानंतर दिवाळीमुळे गाळप उशिरा सुरू झाले. कोल्हापूर, सांगलीत शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कारखाने उशिरा सुरु झाले. राज्यात ८८ सहकारी व ९२ खासगी असे एकूण १८० साखर कारखाने गाळप करत आहेत. कोल्हापूर २१ सहकारी व ११ खासगी असे एकूण ३२ कारखाने तर पुणे विभागात १६ सहकारी व ११ खासगी असे २७ कारखाने गाळप करत आहेत.

सर्वाधिक साखर उत्पादन पुणे जिल्ह्यातआतापर्यंत २०२.४४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून १६.३५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे जिल्ह्यात ३.९ लाख टन तर सोलापूर विभागात ३.४ लाख टन इतके झाले आहे. कोल्हापूर विभागात ३.२, नगर विभागात २.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात पहिल्या सव्वा महिन्यात आतापर्यंत केवळ ८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी हाच साखर उतारा ८.८७ टक्के इतका होता. पुणे विभागात ८.३३, सोलापूर विभागात ७.३९, नगर विभागात ७.९६, नांदेड विभागात ८.१२, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी ६.८३ टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे.

सहभागी साखर कारखानेसोलापूरमध्ये सहकारी १५ व खासगी २९ असे ४४ कारखाने, नगर विभागात १४ सहकारी व १० खासगी असे २४, औरंगाबाद विभागामध्ये १३ सहकारी, ९ खासगी असे २२, नांदेड विभागात ९ सहकारी व १९ खासगी असे २८ तर अमरावती विभागात दोन व नागपुरात एक खासगी कारखाना गाळप हंगामात सहभागी झाला आहे.

पावसाने ओढ दिल्यानेपावसाने ओढ दिल्याने ऊस वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच साखर उतारा कमी मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याचा परिणाम लागवडीवर देखील झाला असून, गाळप हंगाम यंदा आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यताही कारखानदार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात १९२ साखर कारखाने सुरू होते. त्यातून २७८ लाख टन उसाचे गाळप होऊन २४ लाख टन साखर उत्पादित झाली होती.

टॅग्स :साखर कारखानेऊसपाऊसपुणेकोल्हापूरसोलापूरसांगली