Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना १० टक्के परतावा; फळझाडे, गोठा व घर यासांठी किती रुपये मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:09 IST

purandar vimantal update पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के भूखंडाचा परतावा मिळणार आहे.

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना १० टक्के भूखंडाचा परतावा मिळणार असून, यासाठी सुमारे २४५ हेक्टर अतिरिक्त जमीन संपादित करण्यात आली आहे.

ज्या शेतातील बाधित घरांसाठी अडीच गुंठ्यांचा विकसित भूखंड देण्यात येणार आहे. यासाठीही सुमारे ३० हेक्टर अतिरिक्त जमीन संपादित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पुरंदरविमानतळासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक बाधित शेतकऱ्याला १० टक्के जमिनीचा परतावा देण्यात येणार आहे.

हा भूखंड विकसित करण्यात येणार असून त्यात रस्ते, पाणी, वीज या सुविधा एमआयडीसीकडून देण्यात येणार आहेत.

हा विकसित भूखंड एअरोसिटीमध्ये आणि विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ असेल यासाठी १ हजार २१६ हेक्टर व्यतिरिक्त अतिरिक्त २४५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
◼️ संमतीने भूसंपादन झाल्यानंतरच हा १० टक्के भूखंड परतावा शेतकऱ्यांना देण्यात येईल मात्र, १० जूननंतर संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी परतावा मिळणार नाही.
◼️ संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीत ज्या शेतकऱ्यांची घरे बाधित होत आहेत, अशा शेतकऱ्यांना अडीच गुंठ्यांचा विकसित भूखंड देण्यात येणार आहे.
◼️ यासाठी खानवडी व पारगाव या दोन गावांमध्ये प्रत्येकी १५ हेक्टर अशी एकूण ३० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हा भूखंड एअरोसिटी किंवा गावात देण्यात येईल.
◼️ शेतकऱ्यांना या संदर्भात एक पर्याय निवडता येणार आहे. या भूसंपादनात एकूण ५९७ घरे बाधित होणार आहेत, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
◼️ भूसंपादनाच्या मोबदल्याव्यतिरिक्त भूमिहीनांना ७५०, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५०० दिवसांच्या मजुरीचे मूल्य देण्यात येणार आहे.
◼️ एकूण संपादित जमिनींमध्ये सीताफळ आणि अंजीर या दोन फळपिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
◼️ त्यासाठी सीताफळाला ११ ते १३ हजार व अंजिराला १० ते १३ हजार रुपये प्रतिझाड मोबदला देण्यात येणार आहे. तो या रकमेच्या दुप्पट दिला जाणार आहे.

कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार
◼️ करारनामा झाल्यानंतर पुढील महिना दीड महिन्यात परतावा दिलेल्या भूखंडाचा सातबारा किंवा मालमत्ता पत्र शेतकऱ्यांना दिले जाईल, असेही डुडी यांनी यावेळी स्पष्ट केले.
◼️ या तीन हजार एकर जमिनीत एकूण तेराशे सर्व्हे क्रमांक असून त्यात सुमारे साडेसहा हजार कुटुंबे बाधित होणार आहेत. यातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
◼️ घर स्थलांतर करण्यासाठी ४० हजार रुपये, तर गोठा स्थलांतर करण्यासाठी २० हजार रुपयेही देण्यात येणार आहेत.

संपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमती घेण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ४३६ हेक्टर क्षेत्राची संमती मिळाली आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसांत ५० टक्के क्षेत्राची संमती मिळेल. मोबदला देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे ५०० कोटी रुपये जमा झाले आहेत. गरजेनुसार पैसे जमा होणार आहेत. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

अधिक वाचा: द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

English
हिंदी सारांश
Web Title : Purandar Airport: Farmers to Get Land, Compensation for Trees, Sheds

Web Summary : Farmers giving land for Purandar Airport will receive 10% land return. Those losing homes get developed plots. Compensation includes trees (₹10-13k/tree), ₹40k for house, ₹20k for shed relocation. One family member gets a job.
टॅग्स :शेतीशेतकरीपुरंदरविमानतळराज्य सरकारसरकारफळेजिल्हाधिकारी