रमेश वाबळे
आजच्या काळात शेती व पशुपालन परवडत नाही, असे म्हणत अनेकजण या क्षेत्राकडे पाठ फिरवत असताना, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तळणी येथील महादा कोरडे आणि ज्ञानेश्वर कोरडे या बाप-लेकांनी मात्र समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.(Success Story)
कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता, केवळ जिद्द, मेहनत आणि गोमातेप्रती असलेल्या अपार प्रेमाच्या जोरावर त्यांनी उभारलेली 'जय भोलेनाथ गोशाळा' आज तब्बल २५० गायींचे संगोपन करणारी एक आदर्श गोशाळा ठरली आहे.(Success Story)
मोजक्या गायींपासून भक्कम गोशाळेपर्यंतचा प्रवास
दहा वर्षांपूर्वी काही मोजक्या गायींपासून सुरू झालेला हा प्रवास आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारला आहे.
सुरुवातीला आर्थिक अडचणी, चाऱ्याचा प्रश्न आणि मनुष्यबळाचा अभाव या सर्व अडथळ्यांवर मात करत कोरडे कुटुंबीयांनी गोशाळेचा पाया मजबूत केला. आज ही गोशाळा परिसरातच नव्हे, तर जिल्हाभरात एक प्रेरणास्थान बनली आहे.
वाढते खर्च आणि अनुदानाची मर्यादा
अलीकडच्या काळात शासनाने गोवंश संवर्धनासाठी प्रति गाय दररोज ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्याच्या महागाईच्या काळात ही रक्कम अपुरी असल्याचे महादा कोरडे सांगतात.
एका गायीचा रोजचा चारा, पाणी, औषधोपचार आणि मजुरीचा खर्च या रकमेत भागत नाही. तरीही कोणतीही तक्रार न करता, गोसेवा हेच आपले व्रत मानून कोरडे कुटुंबीय गोशाळा चालवत आहेत.
कुटुंबाचा रात्रंदिवस राबता
ही गोशाळा केवळ एक संस्था नसून, कोरडे कुटुंबासाठी ती एक साधना आहे. महादा कोरडे यांच्यासह त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर कोरडे, तसेच घरातील महिला सत्यभामा कोरडे आणि रूपाली कोरडे हे सर्वजण रात्रंदिवस गोसेवेत व्यस्त असतात.
वाढत्या गोसंख्येची योग्य देखभाल करण्यासाठी दोन मदतनीसही ठेवण्यात आले आहेत.
चारा, पाणी आणि औषधोपचारावर मोठा खर्च होत असतानाही, हे कुटुंब मोठ्या हिमतीने गोशाळा अविरतपणे चालवत आहे.
सेवाभावातून आत्मनिर्भरतेकडे
केवळ दानधर्म किंवा अनुदानावर अवलंबून न राहता, गोशाळा आत्मनिर्भर करण्यासाठी कोरडे कुटुंबीयांनी पुढचे पाऊल टाकले आहे.
गोशाळेतून मिळणाऱ्या शेणापासून सेंद्रिय खत, गोमूत्रापासून नैसर्गिक कीटकनाशके तसेच विविध औषधी उत्पादने तयार करण्याचा मानस ज्ञानेश्वर कोरडे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गोशाळेला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळणार असून गोमातांचा सांभाळ अधिक सुकर होणार आहे.
समाजासाठी प्रेरणा
आज जय भोलेनाथ गोशाळा ही केवळ २५० गायींचे संगोपन करणारी गोशाळा नसून, ती गोसेवेची चळवळ बनली आहे.
पशुपालन परवडत नाही, असे म्हणणाऱ्यांसाठी कोरडे कुटुंबाची ही वाटचाल एक जिवंत उदाहरण आहे.
निस्वार्थ सेवा, कुटुंबाचा सहभाग आणि आत्मनिर्भरतेचा ध्यास घेतला, तर कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकते.
