Animal Heatwave Care : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, उष्माघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.सध्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून दुपारच्या वेळेत कडक उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. (Animal Heatwave Care)
या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.(Animal Heatwave Care)
दिवसातून ३-४ वेळा पाणी देणे गरजेचे
तज्ज्ञांच्या मते, जनावरांना दिवसातून किमान तीन ते चार वेळा स्वच्छ व थंड पाणी देणे अत्यावश्यक आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा व ताण वाढतो. त्यामुळे गोठ्यात सतत पाण्याची उपलब्धता ठेवावी.
सावली, हवा आणि थंडावा महत्त्वाचा
जनावरांना उन्हापासून वाचवण्यासाठी गोठ्यांमध्ये पुरेशी सावली, हवा खेळती राहील याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
शक्य असल्यास पंखे किंवा कूलरचा वापर करावा. जनावरांच्या शरीरावर वेळोवेळी पाण्याचे शिंतोडे मारल्यास त्यांना थंडावा मिळतो.
दुपारच्या उन्हात चारणे टाळा
तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार, जनावरांना सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा चारायला नेणे योग्य ठरते.
दुपारच्या कडक उन्हात चारायला नेल्यास जनावरांवर ताण येऊन उष्माघाताचा धोका वाढतो.
उष्माघाताची लक्षणे ओळखा
जनावरांमध्ये श्वासोच्छ्वास वेगाने होणे, तोंड उघडे ठेवणे, भूक मंदावणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अशावेळी जनावरांना सावलीत बांधून थंड पाणी द्यावे आणि जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
चाऱ्याबाबत घ्यावयाची काळजी
पशुपालकांनी शक्यतो हिरवा चारा (ज्वारी, मका, नेपियर गवत) ओलसर स्वरूपात द्यावा, ज्यामुळे शरीरातील पाण्याची गरज काही प्रमाणात पूर्ण होते.
कोरडा चारा (भुसा, कडबा) देताना त्यावर पाणी शिंपडल्यास तो पचायला सोपा होतो.
सध्या हिरव्या चाऱ्याची टंचाई असल्याने कोरडा चारा देताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जाफराबाद तालुक्यात ४१ हजार जनावरे
जाफराबाद तालुक्यात सध्या सुमारे ४१ हजार जनावरांची नोंद असून, यामध्ये गायी, म्हशी आणि बैलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तापमान वाढीमुळे या सर्व पशुधनावर उष्णतेचा परिणाम जाणवत आहे.
सध्या वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये उष्माघाताचा धोका वाढला आहे. पशुपालकांनी जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी, सावली आणि संतुलित आहार द्यावा. दुपारच्या वेळेत जनावरे बाहेर नेणे टाळावे आणि लक्षणे दिसताच त्वरित उपचार करावेत. - नितीन देव्हाणे, पशुवैद्यकीय अधिकारी
उन्हाळ्यात योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर काळजी घेतल्यास पशुधनाचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते. पशुपालकांनी तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन केल्यास उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
अधिक वाचा : Agriculture News : माथाडी कामगारांना दिलासा, पण शेतकऱ्यांचा खर्च वाढणार?
