अविनाश मुडेगावकर
राज्यातील गोवंश संवर्धन आणि गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने गोसेवा आयोगासाठी तब्बल १२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (Goshala)
या निधीच्या माध्यमातून गोशाळांना स्वावलंबी करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करण्याच्या योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.(Goshala)
मुंदडा यांनी सांगितले की, गोवंश रक्षा आणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या दोन उद्दिष्टांवर आयोगाचा भर आहे. भाकड झालेल्या गायी कत्तलखान्याकडे जाऊ नयेत यासाठी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून आर्थिक मदत दिली जात आहे.
गेल्या चार वर्षांत सुमारे साडेपाच कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून, या उपक्रमातून ५, २०० हून अधिक गोवंशाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
गोमूत्र-शेणापासून उत्पादने
राज्यातील गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोमूत्र आणि शेणापासून विविध उत्पादने तयार करून त्यांचे ब्रँडिंग करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीसाठी खत, कीटकनाशके, तसेच इतर उपयुक्त उत्पादने तयार करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.
‘गो-काष्ठ’चा पर्याय
पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी लाकडांऐवजी शेणापासून तयार केलेल्या ‘गो-काष्ठ’चा वापर वाढविण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. या संकल्पनेमुळे झाडांची तोड कमी होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल, तसेच गोशाळांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
गोसेवा आयोगाच्या माध्यमातून केवळ गोवंश संवर्धनच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुंदडा यांनी स्पष्ट केले. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत कार्यकर्त्यांनी जनतेत विश्वास निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
