Dairy Farmers : हिंगोली तालुक्यातील खानापूर (चित्ता) गावातील 'लाडक्या बहिणीं'नी पशुपालन आणि दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. (Dairy Farmers)
पारंपरिक शेतीलादुग्धव्यवसायाची जोड देत या महिलांनी आर्थिक स्वावलंबनाची वाट धरली असून, आज गावात दररोज हजारो लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. या उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण तर झालेच आहे, शिवाय गावाच्या अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळाली आहे.(Dairy Farmers)
खानापूर (चित्ता) येथील अनेक महिलांनी स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून गायी-म्हशींचे संगोपन सुरू केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत दूधसंकलन, साठवण, वेळेवर विक्री आणि बाजाराशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यात आला. (Dairy Farmers)
परिणामी, महिलांना दररोज निश्चित उत्पन्न मिळू लागले. घरखर्च भागविण्यासोबतच मुलांचे शिक्षण, आरोग्य, बचत आणि भविष्यातील गुंतवणुकीकडेही महिलांचे लक्ष वळले आहे.(Dairy Farmers)
या यशामागे प्रयोगशील शेतकरी व शासकीय योजना अभ्यासक राम जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. शासनाच्या पशुपालन, दुग्धव्यवसाय, बायोगॅस व अनुदान योजनांची माहिती त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवली. संतुलित चारा व्यवस्थापन, लसीकरण, जनावरांची आरोग्य तपासणी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून गुणवत्ताही सुधारली आहे.(Dairy Farmers)
गावातील काही महिलांनी दुग्धव्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून जनावरांची संख्या वाढवून व्यवसायाचा विस्तार केला आहे. शासकीय डेअरीला दूध विक्री केल्यामुळे काहींना बायोगॅस प्रकल्प व जनावरे अनुदानावर मिळाली. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रीय खत उपलब्ध झाले असून घरगुती इंधनाची गरजही कमी झाली आहे.
या उपक्रमामुळे खानापूर (चित्ता) गावात सकारात्मक बदल घडून आला आहे. रोजगारनिर्मिती वाढली असून स्थलांतराला आळा बसला आहे.
महिलांचा आत्मविश्वास वाढत असून त्या आता केवळ दूध उत्पादक न राहता गावाच्या विकासातील सक्रिय भागीदार बनल्या आहेत. पशुपालनाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या दुग्ध धवलक्रांतीमुळे खानापूर (चित्ता) गाव जिल्ह्यात प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
शासनाच्या अनेक योजना असल्या तरी त्याची माहिती खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी शेतकरी महिलांना योग्य मार्गदर्शन केले. आज त्या महिलांचे आर्थिक सबलीकरण झाले आहे.- राम जाधव, प्रयोगशील शेतकरी व योजना अभ्यासक
शासकीय डेअरीला दूध विक्रीमुळे मला बायोगॅस व जनावरे अनुदानावर मिळाली. त्यामुळे इंधनाची गरज कमी झाली आणि शेतीसाठी सेंद्रीय खत उपलब्ध झाले.- सुरेखा जाधव, खानापूर (चित्ता)
शेतीला जोडव्यवसाय म्हणून सुरू केलेल्या दुग्धव्यवसायातून आज दररोज शेकडो लिटर दूध उत्पादन होते. थेट बाजारात विक्रीमुळे उत्पन्न समाधानकारक आहे.- सिमा जाधव, खानापूर (चित्ता)
