नितीन चौधरीपुणे : गोवंशीय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी रोगाच्या लसीच्या चाचणीचे निकाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक निष्कर्षावरून ही लस सुरक्षित आणि सुरक्षा पुरविणारी आहे.
त्यामुळे राज्यातील रोगाचा प्रादुर्भाव पाहता निकालांच्या आधारे लस उत्पादनाची परवानगी देण्याचा प्रस्ताव पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून केंद्रीय औषध महानियंत्रकांना देण्यात येणार आहे.
ही परवानगी मिळाल्यानंतर सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत ही लस सबंध राज्यातील गोवंश जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
राज्यात गेल्यावर्षी लम्पीच्या प्रादुर्भावामुळे गोवंशीय जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागण होऊन हजारो जनावरांचा मृत्यू ओढावला होता.
राज्य सरकारने यासाठी लसीकरणाची मोहीमही राबविली. यंदाही अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने तयार केलेल्या लसीच्या निकालांची प्रतीक्षा आहे, अशी माहिती विभागाचे सहआयुक्त डॉ. याह्या खान पठाण यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
पठाण म्हणाले, "गेल्यावर्षीच्या प्रादुर्भावानंतर विभागानेच ही लस तयार करण्याचे ठरविले. त्यानुसार पुण्यातील प्रयोगशाळेत ती तयारही करण्यात आली.
त्यानंतर राज्यातील ताथवडे (पुणे), जत (सांगली), जुनोने (सोलापूर) कोपरगाव (अहिल्यानगर) आणि पोहरा (अमरावती) या पाच ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या.
हा रोग मुख्यत्वे गोवंशीय जनावरांमध्येच आढळत असला तरी ताथवडे येथे १०० म्हशींवरही या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. ताथवडेसह प्रत्येक ठिकाणी १०० गाईवर या लसीची चाचणी घेण्यात आली.
केंद्रीय औषध महानियंत्रकांच्या निर्देशांनुसार या लसीची ३०, ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने चाचणी घ्यावी लागते. त्यानुसार या पाचही ठिकाणी ३० व ६० दिवसांच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
त्याचे प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक असून लस जनावरांसाठी सुरक्षित असून ती रोगापासून संरक्षण देण्यात सक्षम असल्याचे दिसून आले आहे.
तरीही या चाचण्यांच्या नोंदी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार संस्थेकडून पहिल्या ३० दिवसांच्या चाचणीचे निकाल दोन दिवसांत उपलब्ध होतील."
पुण्यातच लसीचे उत्पादन◼️ संस्थेच्या मान्यतेनंतर महानियंत्रकांकडे लसीच्या उत्पादनासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. मात्र, राज्यातील सध्याची रोगाची स्थिती पाहता ३० दिवसांच्या चाचण्याच्या आधारेच उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून जनावरांना तातडीने ही लस देता येऊन मृत्यू हानी टाळता येईल, असा प्रस्ताव विभागामार्फत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.◼️ महानियंत्रकांकडून ही परवानगी मिळाल्यानंतर लसीचे ६ लाख डोस महिनाभरात उत्पादित होतील.◼️ पुण्यातील आयुक्तालयाच्या परिसरातील प्रयोगशाळेतच त्याचे उत्पादन शक्य असून सबंध राज्यातील सर्व गोवंशीय जनावरांसाठी पुढील सहा महिन्यांच्या आत ही लस उत्पादित होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी जनावरांना देण्यात आलेली लस शेळ्यांसाठी देवीची लस (गोट पॉक्स) होती. त्यातून जनावरांना ८ महिन्यांसाठी ८० टक्के संरक्षण मिळते. लसीकरणानंतरही काही जनावरांमध्ये यंदाही रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र, या जनावरांमध्ये रोगीची तीव्रता तुलनेने कमी आहे. लसीचा हा परिणाम आहे. आता लम्पीवर स्वतंत्र लस तयार केली आहे. तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर येत्या सहा महिन्यांत सबंध राज्यात ही लस उपलब्ध होईल. - डॉ. याह्या खान पठाण, सहआयुक्त, पशुसंवर्धन
अधिक वाचा: PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे?