Join us  

उन्हाळ्यात पोटात आग? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी 8 सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 5:33 PM

उन्हाळ्यात पोटात नुसती आग भडकलीये..शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा 8 सोपे कूल उपाय

ठळक मुद्देआहारात थंड प्रकृतीचे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या फळांचा, भाज्यांचा समावेश करावा. नारळाच्या पाण्यासोबतच खोबऱ्याच्या तेलाच्या वापरानंही शरीरातील उष्णता बाहेर पडते.शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी रोज एक ग्लास ताक प्यावं.

उन्हाळ्यात शरीरातील पित्त दोष वाढतो. पित्त दोष वाढला की पोटाच्या समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात पाणी कमी प्याल्यास, आहारात पाण्याचं प्रमाण कमी राहिल्यास शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे शरीरात, पोटात उष्णता वाढते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी केवळ पाणी पिऊन  भागत नाही, त्यासाठी आहार विहारातील उपाय करणं महत्वाचं आहे.  आयुर्वेदिक तज्ज्ञ श्रेय शर्मा यांनी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सहज करता येतील असे उपाय सांगितले आहेत. 

Image: Google

1. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात थंड प्रकृतीच्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात काकडी, ब्रोकोली या भाज्या, आवळ्याचे पदार्थ, टरबूज, खरबूज ही फळं यांचं सेवन वाढवावं. यामुळे शरीरातील उष्णता तर कमी होतेच सोबत आरोग्यही सुधारतं.

2. शरीरातील उष्णता बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवं. पाणी पिण्यासोबतच आहारात पातळ पदार्थांचा समावेश अवश्य करावा. सूप, ताक, रश्याच्या भाज्या, अधून मधून ऊसाचा रस प्यायला हवा. 

Image: Google

3. उन्हाळ्याच्या दिवसात ओव्याच्या पानांचा समावेश आहारात करायला हवा. ओव्याच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. ओव्याची पानं सेवन केल्यानं शरीरातील ओलावा वाढतो. ओव्याच्या पानांमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शरीरातील उष्णता कमी होते. 

4. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वेळेवर जेवण करणं आवश्यक आहे. वेळेवर जेवण केल्यानं शरीरातील अग्नीचा योग्य प्रकार वापर होतो. पाचक रस व्यवस्थित स्रवतात. वेळेवर जेवण्यासोबत दोन्ही वेळेसच्या जेवणात सॅलेडचा समावेश करावा.  आहारात पुदिना, कोरफड यांचा समावेश अवश्य करावा. 

5. आहारात उष्णता वाढवणारे पदार्थ टाळावेत. आंबट फळं, आंबट पदार्थ, लसूण, आलं, तिखट मसालेदार पदार्थ खाणं टाळावेत. काळी मिरी, लवंगा, दालचिनी या मसाल्यांचा वापर कमी करावा.  तिळाचं तेल, एरंड्याच्या तेलाचा वापर टाळावा. 

Image: Google

6. उन्हाळ्याच्या दिवसात नारळाचं पाणी प्यावं. नारळाच्या पाण्यानं शरीरातील तापमान संतुलित राहातं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर ठरतं. नारळ पाण्यात जीवनसत्वं, खनिजं भरपूर प्रमाणात असतात. नारळाच्या पाण्यानं शरीरात थंडावा निर्माण होतो. नारळ पाण्यासारखंच खोबऱ्याचं तेलही शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी फायदेशीर असतं. खोबऱ्याच्या तेलानं पायाला आणि अंगाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते 

7. ताक हे प्रकृतीनं थंड असतं. ताक प्याल्यानं शरीरातील उष्णता कमी होते. ताकात पोषक गुणर्म असतात. ताकानं शरीराला ऊर्जा मिलते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रोज एक ग्लास ताक प्यावं.

Image: Google

8. थंड पाण्यानं शरीरातील उष्णता कमी होते. एका टबात पाणी घ्यावं. त्यात  बर्फाचे तुकडे घालावेत. या थंड पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसावं. 

टॅग्स :अन्नआहार योजना