Join us  

डाएट करताना हमखास होणाऱ्या या चुका टाळा; तरच वजन कमी होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 7:11 PM

डाएटिंग करताना होणाऱ्या चुका वजन कमी करण्याऐवजी वजन वाढवत नेतात. डाएटिंग करताना स्वत:च्या मनानं डाएट प्लॅन आखण्याऐवजी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डाएटिंगमधे समज , पूर्वग्रह न आणता शास्त्राचा हात धरणं, चुका टाळणं या बाबी महत्त्वाच्या आहेत.

ठळक मुद्देफिटनेस तज्ज्ञ सांगतात की रोज वजन करणं ही चुकीची बाब आहे. यामुळे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रेरणेवर परिणाम होतो.डाएटिंग म्हणजे विशिष्ट वेळ काहीच न खाणं आणि मग एकाच वेळी खूप खाणं नव्हे. वजन कमी करायचं आहे तर मग दोनदाच किंवा दिवसातून तीन वेळेसच जेवायला हवं असं न करता मधल्या काळात पौष्टिक खाऊ खाण्यावर भर द्यावा.

 डाएटिंग या संकल्पनेला अनेक समज गैरसमज चिटकलेले आहेत. डाएटिंगचा चुकीचा अर्थ गृहित धरुन त्याची सुरुवात केली तर फार थोडया पदार्थांचा समावेश खाण्यात केला जातो. यामुळे काही पदार्थ खाण्याची इच्छा तीव्रतेने डोकं वर काढत राहाते .काही काळानं त्याचा परिणाम डाएटिंग फालतू वाटण्यात होतो आणि मधेच डाएटिंग सोडून दिलं जातं. तर कधी डाएटिंग करताना होणाऱ्या  चुका वजन कमी करण्याऐवजी वजन वाढवत नेतात. डाएटिंग करताना स्वत:च्या मनानं डाएट प्लॅन आखण्याऐवजी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डाएटिंगमधे समज , पूर्वग्रह न आणता शास्त्राचा हात धरणं, चुका टाळणं या बाबी महत्त्वाच्या आहेत.

डाएटिंग -समज- नियम

- डाएटिंगला लागल्या लागल्या वजन कमी होत नाही. त्याला वेळ काळ जावा लागतो. शिवाय केवळ डाएटिंगनं वजन कमी होतं असंही नाही. त्याला पुरेशा व्यायामाची जोड द्यावीच लागते. पण डाएटिंग सुरु झाल्या झाल्या वजन कमी होण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे सारखं किती वजन कमी झालं याकडे लक्ष दिलं जातं. काहीजणी तर घरात वजन काटाच आणून ठेवतात. आणि त्यावर रोज उभं राहून वजन करतात. रोज आपल्या वजनातंजमीन अस्मानाचा फरक पडत नाही. वजनात फरक दिसायला काही आठवडे किंवा महिना तरी लागतो. पण रोज वजन काट्यावर वजनाचा आकडा काहीच हालत नाही हे बघितल्यावर मात्र डाएटिंगवरचा विश्वास उडायला लागतो. आणि एका टप्प्यावर डाएटिंग् निरर्थक वाटू लागतं. आणि ते सोडून दिलं जातं. आणि म्हणूनच फिटनेस तज्ज्ञ सांगतात की रोज वजन करणं ही चुकीची बाब आहे. यामुळे आपल्या वजन कमी करण्याच्या प्रेरणेवर परिणाम होतो. दररोज वजन न करता दर महिन्याला वजन केल्यास वजनात फरक निश्चित दिसतो. वजन कमी करताना वजन कमी करणं एवढाच उद्देश ठेवू नये. तर सुदृढ असण्यावर भर द्यावा. त्यानूसार आहार आणि व्यायामाचे नियम पाळावेत. तज्ज्ञ म्हणतात वजन काट्यावर उभं राहून नाही तर शास्त्रीय नियम नियमित पाळल्यानं वजन कमी होतं.

- आरोग्य व्यवस्थित ठेवून वजन कमी करायचं असेल तर क्रॅश डाएटच्या वाट्याला जाऊ नये. कारण आहारातले काही घटक कमी करुन वजन कमी होण्याची किमया क्रॅश डाएटमधून साधली जाते. पण कमी झालेलं वजन तिथेच थांबत नाही. ते परत वाढण्याकडे कल असतो. तसेच शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते. शरीराला कमी उष्मांक मिळाल्यानं चयापचय क्रियाही मंदावते. त्यामुळे क्रॅश डाएट सोडून जेव्हा नॉर्मल जेवण जेवू लागतो तेव्हाही चयापचय क्रिया मंद राहाते. आणि त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात की वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएटच्या वाट्याला न जता समतोलित आहार घेणं, तीन मुख्य जेवणासोबत मधे मधे पौष्टिक खाणं यामूळे चयापचय क्रिया सुधारते आणि त्याचा परिणाम कॅलरी बर्न होण्यावर आणि वजन कमी होण्यावर दिसतो.

- डाएटिंग म्हणजे विशिष्ट वेळ काहीच न खाणं आणि मग एकाच वेळी खूप खाणं नव्हे. अनेकजण डाएटिंग् करताना सकाळच्या वेळेस काहीच न खाता उपवास करतात आणि मग रात्री खातात. पण तो पर्यंत पोटातील भूक इतकी चवताळते की काय पौष्टिक आणि काय हानिकारक याचा विचार करण्याचा अवकाशही देत नाही. आणि या भुकेच्या झपाट्यात तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. म्हणूनच आहारतज्ज्ञ सांगतात की रात्रीच्या जेवणापर्यंत पोट पूर्ण रिकामं न ठेवता पौष्टिक पदार्थ थोड्या प्रमाणात मधून मधून खाणं महत्त्वाचं आहे. त्यामूळे रात्री जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपलं पोट पूर्ण रिकामं नाही याची जाणीव होते. आणि मग रात्रीच्या जेवणात प्रमाणशीर आणि पौष्टिक आहार स्वप्रेरणेने घेतला जातो. याचा परिणाम चयापचय क्रिया आणि वजनावर होतो.

- डाएट म्हणजे आहाराचे नियम . ते ठरवताना आणि पाळताना उगाच चालढकल करु नये. अनेकजणींना वजन कमी करण्यासाठी डाएट तर करायचं असतं पण त्यासाठीची त्यांची मानसिकता तयार झालेली नसते. मग आज नाही उद्यापासून, पुढच्या महिन्यापासून किंवा पुढच्या वर्षीपासून करु असं डाएटींग पुढे ढकललं जातं. विशेषत: घरी काही समारंभ असेल किंवा सणवार असतील तर आहाराचे नियम पूर्णत: बाजूला ठेवले जातात. असं न करता जे खायची इच्छा होते आहे ते प्रमाणात खाऊन नंतरच्या जेवणापासून डाएटचे नियम पाळायला हवेत. एखाद्या वेळेस  डाएट चिट केलं तर हरकत नाही. पण म्हणून पूर्ण डाएटच पाळायचं नाही असं करु नये. मुळात पदार्थ हे खाण्यासाठीच असतात. पदार्थांपासून दूर राहून, त्यांच्याबद्दलची तीव्र इच्छा मनात ठेवून काहीच साध्य होत नाही. पण जे आवडतं ते प्रमाणात खाऊन आणि आहाराचे नियम कल करे सो आज या नियमानं त्वरित पाळायला लागूनच वजन कमी करता येतं.

- वजन कमी करायचं आहे तर मग दोनदाच किंवा दिवसातून तीन वेळेसच जेवायला हवं असं न करता मधल्या काळात पौष्टिक खाऊ खाण्यावर भर द्यावा. जाणीवपूर्वक मधल्या काळात काही खात राहिल्यानं भूक नियंत्रित राहाते आणि त्याचा परिणाम वजन कमी होण्यावर होतो. खाताना मुद्दाम प्रथिनंयुक्त पदार्थ खाल्ले तर त्याचा परिणाम चयापचय क्रिया सुधारण्यावर होतो.