सोशल मीडियावर अनेक घटना व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका घटनेची तुफान चर्चा होताना पाहायला मिळत आहे. जिथे कायद्यापेक्षा मातृशक्ती वरचढ ठरल्याचे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात संतापलेल्या १०० हून अधिक महिलांनी जे केलं, ते पाहून केवळ तिथलं सरकारच नाही तर संपूर्ण देश थक्क झाला. घरातील पुरुषांचे दारूचे व्यसन, त्यामुळे होणारा मानसिक- शारीरिक छळ आणि भररस्त्यात होणारी छेडछाड याला कंटाळून या महिलांनी चक्क दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पाहता पाहता १५ लाख रुपयांची दारू रस्त्यावर ओतून दिली. एखाद्या चित्रपटाला शोभावं असं हे 'रिअल लाईफ' लढाई मंगळवारी दुपारी महरोणी-ललितपूर रोडवरील खिटवांस गावात पाहायला मिळाली.
Mutual Feelings नंतर, आधी Mutual Funds मध्ये इन्व्हेस्ट करा! जेन झी ‘हा’ व्हायरल सल्ला ऐकेल?
एप्रिल २०२५ मध्ये गावात दारुचे दुकान उघडल्यापासून महिलांचे जगणे कठीण झाले होते. मद्यधुंद पुरुषांकडून होणारा छळ, लहान मुलांवर होणारे वाईट संस्कार यामुळे महिलांच्या मनात संताप धुमसत होता.घरातील कमाईचा मोठा हिस्सा दारूवर खर्च होऊ लागल्याने कुटुंबात आर्थिक चणचण भासू लागली आणि त्यातूनच होणाऱ्या वादांमुळे महिलांना शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते. मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास महिलांनी आंदोलन केलं. हातात काठ्या घेऊन सुमारे १०० हून अधिक महिलांनी दुकानासमोर ठिय्या मांडला. महिलांचे आक्रमक रुप पाहून सेल्समने दुकानचे शटर बंद केलं, पण महिलांनी दुकानाचे शटर आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला.
या आंदोलनात दोन गट पडले होते; एक गट बाटल्या बाहेर फेकण्याचे काम करत होते, तर दुसरा गट काठ्यांनी त्या फोडत होता. काही वेळातच रस्ता दारूने ओलाचिंब झाला. या घटनास्थळी दोन पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते पण संतप्त महिलांसमोर जाण्याचे धाडस त्यांनाही झाले नाही.
आंदोलनात सहभागी असलेल्या गुड्डी देवी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, दिवाळीच्या दिवशी दारुड्यांनी माझ्या पतीला मारहाण केली, पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. उलट दुकानदार आम्हाला धमकावत होता. आम्ही गरीब लोक काय करणार? म्हणून आज आम्ही काठ्या हाती घेतल्या आहेत. महिलांनी केवळ दारूच्या बाटल्या फोडल्या नाहीत, तर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेही उद्ध्वस्त केले. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, यात सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून २००० रुपयांपर्यंतच्या महागड्या बाटल्यांचा चक्काचूर झाला आहे.
सुमारे एक तास चाललेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे महरोणी-ललितपूर रस्त्यावर २ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महिला आपले काम फत्ते करून गावात निघून गेल्यानंतर पाच पोलीस ठाण्यांचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी रस्त्यावर पसरलेल्या काचा आणि दारू झाडूने साफ केली, तेव्हा कुठे वाहतूक सुरळीत झाली.
