योगेश गायकवाड
जस्ट एक थप्पड़, लेकिन नहीं मार सकता। अभिनव सिन्हा यांच्या ‘थप्पड’ सिनेमात अमृता नावाच्या एका होममेकरची भूमिका करणाऱ्या तापसी पन्नू या अभिनेत्रीच्या तोंडी हे वाक्य आहे.
सध्या चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे केसमधील हगवणे परिवाराचे वकील ॲड. विपूल दुशिंग यांना घरी आमंत्रित करून त्यांना हा थप्पड सिनेमा दाखवण्याची माझी इच्छा आहे. विधी महाविद्यालयात ‘कौटुंबिक हिंसाचार’ हा विषय शिकवत असताना हे महाशय नेमकं काय करत होते? हे त्यांच्या शिक्षकांना जाऊन विचारणार आहे.
हो ! कारण वैष्णवीला आत्महत्या करायला भाग पाडणारे हगवणे कुटुंबीय जर महिला विरोधी हिंसचारच्या शंभराव्या पायरीवर असतील तर त्यांचा हे वकील त्याच जिन्यावरच्या विसाव्या पायरीवर उभे आहेत.
आणि आज हा लेख लिहिताना मी देखील एक पुरुष म्हणून हे शरमेने कबूल करतो की मी देखील या जिन्यावर खाली कुठेतरी उभा असेल. कितीही स्त्रीवादी / फेमीनिस्ट असला तरीही भारतातला प्रत्येक ( हो प्रत्येक ) पुरुष महिला विरोधी हिंसाचाराच्या जिन्यावर कुठे ना कुठेतरी उभा आहे. जे मुलींना जन्मताच मारून टाकतात, हुंड्यासाठी मारून टाकतात किंवा ऑनर कीलींग करतात ते या जिन्यावर वरच्या पायरीवर उभे असतात तर जे फक्त पजेसिव्ह असण्याच्या आड महिलांवर अधिकार गाजवत असतात ते देखील कुठेतरी खालच्या पायरीवर उभे असतात. आणि नवरा म्हणून अधिकाराने, काळजीने, प्रेमाने किंवा तिच्या भल्यासाठी म्हणून बायकोच्या दोन चार कानाखाली मारणारे याच जिन्यावर मध्यभागी उभे असतात. संधी मिळताच ही सर्व जण वरची पायरी चढू शकतो. आणि आम्ही पुरुष कळत नकळत जितक्या पायऱ्यावर चढत जाऊ तितकं या समजातलं महिलांचं जगणं कठीण होत जाणार आहे.
स्वत: निवांत मोबाईल बघत बसलेला नवरा धुणं वाळत घालणाऱ्या बायकोला ‘प्यायला पाणी घे ग जरा’ असं हक्काने सांगतो तेव्हा तो आधीच या जिन्याची पहिली पायरी चढलेला असतो. स्वत: शर्टची तीन बटणं उघडी टाकून गावभर हिंडणारा नवरा, बायको ओढणी न घेता गॅलरीत उभी राहिली म्हणून तिचे संस्कार काढतो, तेव्हा तो पण या जिन्याच्या २-४ पायऱ्या चढलेला असतो. राग आला तर आपली समजून बायकोच्या कानाखाली मारणारा, तिच्यावर प्रेम आहे म्हणून हक्काने मारणारा, तीची काळजी वाटते म्हणून तिच्याच भल्यासाठी तिला मारणारा किंवा टेंशन मध्ये दारू पिऊन नशेत तिच्यावर जस्ट हात उचलणारा .. असे हे सगळे याच बरबादीकडे जाणाऱ्या जिन्यावरचे चढेकरी आहेत.
आपल्या कडे पोरींना पण अशाच पितृसत्ताक वातावरणात वाढवलं जात असल्याने त्यांना बिचाऱ्यांना पण वरील किरकोळ मारहाण गैर वाटत नाही. आणि वाटली तरी त्याविरुद्ध आवाज उठवण्याची मुभा त्यांना आपला समाज देत नाही. दारूच्या नशेत पुरुष कधी आपल्या बॉसला किंवा आपल्यापेक्षा पावरफुल माणसाला असं सहज म्हणून मारतो का ? काळजी वाटते म्हणून आपल्या मित्राला असं मनात आलं तेव्हा मारू शकतो का? मग तो फक्त बायकोलाच का मारतो बरं ? कारण त्याने लहानपणापासून बाईला असंच मार खाताना पाहिलेलं असतं. तिच्या शरीरावर, मनावर आपला अधिकार आहे असंच त्याला वाटत असतं. त्याला ही कोणी सांगितलेलंच नसतं की भावड्या, हा तुझा अधिकार तर नाहीच पण तो कायद्याने गुन्हा देखील आहे. आज कायद्याच्या रक्षणकर्त्यांनाच ही माहीत नाही तर सामान्य पुरुषांना याची जाणीव असण्याची अपेक्षा तरी कशी करायची ?
‘ एक किरकोळ थप्पड जरी असली तरी तो तिला मारू शकत नाही,’ हा स्टँड घ्यायला मुलींना शिकवायलाच पाहिजे पण त्याही पेक्षा तातडीने ते मुलग्यांना शिकवलं पाहिजे. ‘तो मारत होता तेव्हा तू गप्प का बसलीस? तो फ्लर्ट करण्यासाठी नंबर मागत होता तेव्हाच का नाही बोललीस?’ असे प्रश्न मुलींना विचारण्यापेक्षा हे असं वागण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये आणि असं वागण्याने तुम्ही अजिबात कूल वाटत नाही आहात, असं मुलग्यांना शिकवलं गेलं पाहिजे.
मुलग्यांना काय शिकवाल?
सिनेमा सारख्या माध्यमातून हे सांगणारा ‘थप्पड’ सारखा एखाद दूसरा सिनेमा येतो पण बहुतांश सिनेमे हे ॲनिमल आणि कबीर सिंग सारखे येतात. ही जरी टोकाची उदाहरणं असली तरीही या दरम्यान बाईला ‘आयटम’ समजणाऱ्या फिल्म मेकर्सची मोठी फळी आहे. अशाप्रकारे प्रेयसीवर प्रेम म्हणून राग काढणे, बायकांच्या ड्रायव्हिंगवर विनोद म्हणून कॉमेंट करणे, ‘एवढी साधी अक्कल नाहीये का ?’ म्हणून उठता बसता त्यांचा अपमान करणे, जस्ट कानाखाली मारणे, माहेरी संपर्क ठेवू न देणे, परवानगी न घेता मोबाईल चेक करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारूनच टाकणे इत्यादी आपण सहज म्हणून केलेल्या गोष्टींमुळे महिलांना खूप जास्त भोगावं लागतं. त्यांच्या रोजच्या जगण्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो आणि ही सगळी कृत्य एक प्रकारे कौटुंबिक हिंसाचारात मोडतात. आणि ज्या कोणा पुरुषांना वकील साहेबांच्या या व्यक्तव्यात फारसं काही गैर वाटत नाही त्यांनी फक्त विचार करावा की समजा वरील सगळ्या गोष्टी बायकांनी पुरुषांच्या बाबतीत केल्या तर, टेंशन आलं म्हणून बाई दारू पिऊन घरी आली आणि नशेत नवऱ्याच्या दोन कानाखाली लावल्या तर, काळजी वाटते म्हणून किंवा प्रेमाने, हक्काने बायका नवऱ्याना मारू लागल्या तर, साधा विचार सुद्धा आपल्याला सहन होत नाही. अशावेळी बायकांनी आयुष्यभर हे सहन कसं आणि का करायचं?
याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की बायकोच्या मोबाइल मध्ये ‘तसल्या’ चॅटचे पुरावे सापडले आणि पुरुषाला राग आला तरीही, हो अशा परिस्थितीतही पुरुष बाईला मारू शकत नाही. बोलू शकतो, विचारू शकतो, कायद्याची मदत घेऊ शकतो. पण फक्त स्वत:च्या मोबाइल मध्ये ‘तसला’ काहीच चॅट नाहीये याची खात्री असेल तरच. ही नैतिक भान पुरुषांनी स्वत: मध्ये शोधलं पाहिजे.
काय करायला हवं?
एकूण काय तर हा विषय शालेय शिक्षणात आणला गेला पाहिजे.
पोलिसांच्या ट्रेनिंग मध्ये फक्त एक गेस्ट लेक्चरर बोलवून विषय आवरून न टाकता एक पूर्ण वेगळा विषय म्हणून गांभीऱ्याने हा विषय शिकवला गेला पाहिजे.
आणि पोलिस विभागातील वरिष्ठ पदांवरील महिला, पुरुष आणि इतर अधिकाऱ्यांनी यासाठी विशेष पाठपुरावा देखील केला पाहिजे.
प्रत्येक बार कौन्सिलने वकिलांचं जेंडर सेन्सटायझेशन सातत्याने करत राहिलं पाहिजे.
सिनेमा, नाटक, साहित्य, समाज मध्यमावरील लिखाण, यू ट्यूब इनफ्लूएन्सर्स, शिक्षक, पालक अशा सर्व माध्यमांनी मुलग्याना समानता शिकवण्याची आणि मुलींच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
नवीन पिढीतल्या मुलग्यांना ही सगळं शिकवणं हे आशेच्या सोनेरी किरणाची वाट पाहणं आहे.
पण सध्या एक प्रौढ पुरुष म्हणून समाज व्यवस्थेवर नागोबा बनून विळखा मारून बसलेल्या पुरुषांच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी काही कठोर पावलं पण उचलली गेली पाहिजेत.
कुणीच अकांड तांडव न करता स्त्री पुरुष समानतेचा हा विषय समजून घेण्यासाठी आपल्या मनाची दारं उघडी करावीत.
आणि आपण सर्व पुरुषांनी पुरुष म्हणून मिरावण्यापेक्षा माणूस बनून जगण्याच्या दिशेला निघायला सुरुवात तरी करावी.
योगेश गायकवाड
(लेखक फिल्ममेकर आहेत.)
yogmh15@gmail.com