...तर सोशल मीडियात चर्चा कसली तर म्हणे आलिया भट आणि करिना कपूरने पिठलं-भाकरी खाल्ली! आता यात चार लोकांना सांगावं असं काय आहे?
ऋजुता दिवेकर या आहारतज्ज्ञांच्या घरी करिना आणि आलिया जेवायला गेल्या होत्या. चांदीच्या ताटात भाजीभाकरी-पिठलं-कोशिंबीर. भाकरी अगदी चानकीएवढीच. त्यावर तूप. आलिया भटने तर त्या ताटाचा फोटोच सोशल मीडियात टाकला आणि चर्चा सुरू झाली.
कुणी म्हणाले, पिठलंभाकरीत काय विशेष, कुणी म्हणे पाहुणे आले तर पिठलंभाकरी कोण वाढतं?
त्या चर्चेऐवजी एक मुद्दा मात्र महत्त्वाचा आहे. ते म्हणजे आपण खातो काय? आपल्या ताटात स्थानिक पदार्थ, स्थानिक खाद्यसंस्कृतीचा भाग असलेले पदार्थ, स्थानिक धान्य, भाज्या, फळं असतात की डाएटच्या नव्या स्टाइलप्रमाणे आपण भाजीभाकरीच विसरून जाणार? पिठलंभात, पिठलंभाकरीची चवच विसरणार?
आजकाल अनेक जण वजन कमी करायचं म्हणून केवळ सॅलेड सूप खातात, भात-भाकरी-गहू, बाजरी सगळं बंद करून टाकतात. नुसत्या भाज्या खातात किंवा नुसत्या उसळी. वजन कमी होतं की नाही हा भाग वेगळ्या चर्चेचा विषय; पण, पोटभर अन्न, त्याची चव, त्यातलं खाद्यशहाणपण, खाऊन मस्त वाटणं हे सारं महत्त्वाचं नाही का? चटणीभाकरी-पिठलंभाकरी-वरणभात-खिचडी हे घरोघर होणारे पदार्थ नव्या काळात अनेकांना शत्रू का वाटू लागले आहेत? ऋतुप्रमाणे, आपल्या घरातील पारंपरिक आहारपद्धतीनुसार खाणे, पोळीभाकरी कुस्करून खाणे हे सारेच मागास ठरवले ते कुणी?
बाजारपेठा आणि नव्या आहार संकेतांमुळे आपण पोटभर आनंदानं जेवणच विसरणार असू तर मग काय मजा?
मग, अशी चर्चा होणारच कुणा सेलिब्रिटीने पिठलंभाकरी खाल्ल्याची..
साधं सकस पौष्टिक खाणं अत्यंत महत्त्वाचं, ते आपण विसरलो तर खाण्यातून येणाऱ्या पारंपरिक शहाणपणालाही आपण मुकायचो..
