lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > स्ट्रेंजर फोबिया: कोरोनाकाळात घरबंद मुलं ‘एकलकोंडी’ही झाली; डॉक्टर सांगतात हा उपाय..

स्ट्रेंजर फोबिया: कोरोनाकाळात घरबंद मुलं ‘एकलकोंडी’ही झाली; डॉक्टर सांगतात हा उपाय..

आपल्याच वयाच्या मुलांशी खेळता न येणं, घराबाहेर पडलं तरी बेचैन होणं अशी लक्षणं मुलांमध्ये का वाढत आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 05:19 PM2021-06-04T17:19:46+5:302021-06-04T17:23:05+5:30

आपल्याच वयाच्या मुलांशी खेळता न येणं, घराबाहेर पडलं तरी बेचैन होणं अशी लक्षणं मुलांमध्ये का वाढत आहेत?

Stranger phobia: In the Corona period,children became 'lonely'; fear of going out. | स्ट्रेंजर फोबिया: कोरोनाकाळात घरबंद मुलं ‘एकलकोंडी’ही झाली; डॉक्टर सांगतात हा उपाय..

स्ट्रेंजर फोबिया: कोरोनाकाळात घरबंद मुलं ‘एकलकोंडी’ही झाली; डॉक्टर सांगतात हा उपाय..

- प्रगती जाधव-पाटील

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून पल्लवी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मैत्रीणीकडे पोहोचली. दिवसभर धम्माल करायचं ठरवून आलेल्या तिच्या मुलांनी अवघ्या अर्ध्या तासात ‘आपल्या घरी चल, घरी चल’ म्हणत भूणभूण सुरु केली. मुलं काही ऐकेच ना. समवयस्कांसोबत खेळायलाही मुलं तयार नाहीत, याचा तिला धक्का बसला. डॉक्टर मैत्रीणीशी बोलल्यानंतर मुलांना सार्वजनिक वावराची सवय लाव हा सल्ला त्यांनी तिला दिला आणि पल्लवी चकीतच झाली!
वर्षांहून अधिक काळ घरात राहणं, सणसमारंभ-उत्सव साजरीकरण नसल्याने संपुष्टात आलेल्या सार्वजनिक आयुष्याचा गंभीर परिणाम बालमनांवर होऊ लागला आहे. समाजात मिसळण्याची प्रक्रिया थांबल्याने मुलांमध्ये ‘स्ट्रेंजर फोबिया’चे प्रमाण वाढलंय. ऑनलाईन फॅमिली गेट टूगेदर आणि मित्र परिवारासह केलेले डबल बबल असे काही पर्याय यासाठी उपयुक्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
कोविडच्या आगमनाने चिमुकल्यांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. त्यांच्यात रोज तयार झालेली ऊर्जा खर्ची पडत नसल्याने आलेली अस्वस्थता या मुलांना व्यक्त करता येत नाही. वर्षानुवर्षे सुरू असलेलं रूटीन अचानक बिघडल्याने त्यावर कसं व्यक्त व्हायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. कुटूंबातील मोठ्यांच्या आयुष्यातील ताणही या मुलांच्या अस्वस्थेचे कारण आहे. पालकांना काही विचारायला गेले की त्यांच्याकडून स्पष्ट उत्तरं मिळत नसल्यानेही मुलांच्या गोंधळात वाढ होत आहे. पालकांची कोसळलेली मन:स्थितीत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न ही छोटी करतायत पण आपल्याच ताणाचा सामना करण्यात व्यस्त असलेल्या पालकांना मुलांचे हे प्रयत्न समजत नाहीत.

कोविड काळ कठीण असला तरी ‘हे दिवसही निघून जातील’ हा मोठ्यांचा आशावाद चिमुकल्या मनात पेरणं आवश्यक आहे. यासाठी कुटूंबाने एकत्र बसुन गप्पा मारणं कोविडची भिती दाखवताना आपल्याला याचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यावर सकस चर्चा होणं अपेक्षित आहे. यासह भविष्यात नियोजित असलेल्या गोष्टींबाबत मुलांच्या मनात आस निर्माण करणं आणि जास्तीत जास्त संवाद राखणं महत्वाचं आहे.
भावनिक उलथापालथ आणि मानसिक सक्षमतेचे प्रत्येकाचे प्रमाण वेगवेगळे असते. येणाऱ्या संकटाला तुमचे मन आणि मेंदू कसे सामोरे जाते याचे दोन प्रकार आहेत. त्याला हेल्थी आणि अनहेल्थी कोपिंग असं म्हणतात. जी मुलं परिस्थितीशी जुळवून घेऊन सकारात्मकतेने विचार करतात, त्यांना हेल्थी कोपिंग क्षमता असलेली मुलं म्हणतात. कुटूंबात वाढणारं मुल त्याच्या सवयीप्रमाणे वागणं सोडून बदलू लागलं तर पालकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यात शांत असणारी मुलं अचानक चिडचिडी होणं किंवा दंगा कारणारी लेकरं अचानक अबोल झाली तर त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं.

भवतालच्या वातावरणाचाही होतोय परिणाम

गेल्या काही महिन्यात कोविडने प्रत्येक कुटूंबात शिरकाव केला आहे. औषधे, दवाखाना, त्यासाठी करावी लागणारी धावपळ, अचानक ओढवणारा मृत्यू या सर्वांचीच मुलांच्या मनावर भिती आहे. आपल्या कुटूंबातील कोणी गेलं तर? लहान मुलांना कोविड धोक्याचा आहे, म्हणजे आपण मरणार? असे प्रश्न त्यांच्या मनात डोकावू लागले आहेत. कुटूंबीयांना हे प्रश्न विचारून त्यांना गोंधळात टाकण्यापेक्षा ही मुलं स्वत:च प्रश्नाची उत्तर शोधत बसतात आणि अधिक नैराश्याकडे जात असल्याचेही पाहण्यात आले आहे.

बालरोग तज्ज्ञ सांगतात..


- डॉ. देवदत्त गायकवाड हे बालरोग तज्ज्ञ सांगतात, कोविड काळात मुलांना पालकांचा जास्तीत जास्त सहवास मिळाला, ही जमेची बाजू आहे. पण पालकांच्या आयुष्यात डोकावणाऱ्या ताणाचे दुष्परिणाम या मुलांवर दिसत आहेत. यावर जास्तीत जास्त संवादातून मार्ग काढण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे. मुलं लहान आहेत, म्हणून त्यांना काहीच समजत नाही हा पालकांचा गैरसमज आहे. आपणच त्यांच्याशी व्यवस्थित संवाद राखला तरच त्यांच्या भावनांचा योग्य पध्दतीने निचरा होतो.


(लेखिका ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: Stranger phobia: In the Corona period,children became 'lonely'; fear of going out.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.