Arjun Pandian : कमाल! आई अंगणवाडी सेविका, मुलगा IAS अधिकारी; जिथे अक्षरं गिरवली, तिथेच करतोय क्रांती
Updated:February 6, 2026 17:25 IST2026-02-06T17:16:59+5:302026-02-06T17:25:28+5:30
Arjun Pandian : एक काळ असा होता जेव्हा अर्जुन आपल्या आईसोबत अंगणवाडीत जायचे आणि आज ते त्याच विभागांतर्गत 'सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी' हा पुरस्कार जिंकले आहेत.

केरळ केडरचे २०१७ च्या बॅचचे IAS अधिकारी अर्जुन पांडियन यांची सिद्ध केलं की अशक्य गोष्टीही शक्य करता येतात. अर्जुन यांची आई एस. उषा कुमारी गेल्या २६ वर्षांपासून इडुक्कीच्या छोट्याशा गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत.
एक काळ असा होता जेव्हा अर्जुन आपल्या आईसोबत अंगणवाडीत जायचे आणि आज ते त्याच विभागांतर्गत 'सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी' हा पुरस्कार जिंकले आहेत.
त्रिशूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना अर्जुन पांडियन यांनी अंगणवाड्यांना केवळ सरकारी केंद्र न ठेवता, लहान मुलं आणि ज्येष्ठांसाठी आधुनिक 'कम्युनिटी सेंटर'बनवलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांमध्ये किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये चालणाऱ्या ३०० केंद्रांना स्वतःची हक्काची इमारत मिळवून देण्याचे काम त्यांनी हाती घेतलं आहे.
जेव्हा केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी त्यांना या जबरदस्त कामासाठी सन्मानित केले, तेव्हा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्यांच्या आईच्या डोळ्यातील चमक कोणत्याही पदकापेक्षा मोठी होती.
अर्जुन पांडियन यांनी किलीमन्नूर आणि तिरुवनंतपुरम येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्लमच्या TKM इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं.
नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी TCS मध्ये काम केले, त्यानंतर २०१४ मध्ये राजीनामा देऊन UPSC ची तयारी सुरू केली. त्यांनी मुख्य सचिवांचे स्टाफ ऑफिसर, कामगार आयुक्त आणि कन्नूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
IAS अर्जुन पांडियन यांनी त्रिशूर जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला. जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा जिल्ह्यातील सुमारे ३०० अंगणवाड्यांकडे स्वतःची इमारत किंवा मूलभूत सुविधा नव्हत्या.
अर्जुन यांच्या पुढाकारामुळे आतापर्यंत २० केंद्रांना नवीन इमारत मिळाली असून ५० केंद्रांचे काम सुरू आहे. अरिमपूर पंचायतीमधील एका अंगणवाडीचं नाव तर 'कलेक्टरचं स्वप्न' असं ठेवण्यात आलं आहे.
जिल्हाधिकारी असूनही अर्जुन पांडियन दर आठवड्याला शालेय मुलांशी संवाद साधतात. ते दर आठवड्याला जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या २० विद्यार्थ्यांची भेट घेतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत त्यांच्या दालनात अशा ५३ भेटी झाल्या आहेत. ते मुलांची मते ऐकून घेतात आणि त्यांच्या सूचनांचा आपल्या योजनांमध्ये समावेश करतात. हा 'चाइल्ड-सेंट्रिक' दृष्टिकोनच त्यांना देशातील इतर IAS अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे ठरवतो.
अर्जुन यांचे वडील शेतकरी आहेत आणि आई अंगणवाडी सेविका. IAS अधिकारी होण्यापूर्वी अर्जुन यांनी २.५ वर्षे आयटी क्षेत्रात काम केलं आणि कॉलेजच्या दिवसात त्यांनी चहाच्या मळ्यातही काम केलं आहे.
आई उषा कुमारी आजही इडुक्कीच्या एलाप्पारा पंचायतीमधील अंगणवाडी क्रमांक ४६ मध्ये कार्यरत आहेत. त्या सांगतात की, "माझा मुलगा अनेकदा मला अंगणवाड्यांच्या समस्यांबद्दल विचारायचा. आज जेव्हा आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी त्यांच्या मुलाचा गौरव केला, तेव्हा तो क्षण एखादं स्वप्न सत्यात उतरल्यासारखा होता."