Join us  

तुम्ही आनंदात आहात का? खरंच सांगा, आपण आनंदी असण्याचा निर्णय कोण घेतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 5:33 PM

आपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात, आनंदी राहणे आणि नसणे. आपण कोणता पर्याय निवडणार या प्रश्नाचं उत्तर आपणच द्यायला हवं.

- वंदना अत्रे

पोटावर झालेल्या कॅन्सरच्या एका जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर तीन-चार दिवसांनी भीष्मराज बाम आणि सुधाताई हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते. नेहमीप्रमाणे अतिशय प्रसन्न हसत त्यांनी मला विचारले, “आनंदात आहेस ना?” मी हलकेच मान डोलावली.“आनंदात आहेस ना?” हा प्रश्न पलंगाला जखडून ठेवलेल्या आणि चार दिवस पाण्याचा एक थेंब सुद्धा बघायला न मिळालेल्या एका पेशंटला जेव्हा कोणी विचारत असेल, तेव्हा काय असू शकेल त्याची प्रतिक्रिया? उडी मारून मोठा होकार नक्कीच देता येणार नाही!जणू मनातले जाणून सर म्हणाले, “आनंद कशाचा? हा प्रश्न मला नाही, तर स्वतःला विचारून बघ. पहिला आनंद, तू असल्याचा. इतक्या जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा आयुष्यात परतली आहेस याचा. तो आनंद तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर तुला बघायला मिळतोय त्याचा. तुझ्यावर उपचार करणाऱ्या सर्जनला आणखी एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून मिळाला तो आनंद आणि आणखी एक लढाई लढण्याची संधी तुला मिळाली, त्याचाही....” 

 

त्या तीन-चार दिवसात वाट्याला आलेल्या वेदनांच्या कल्लोळाचेच दुःख करीत असताना आनंदाचे हे छोटे झरे मला दिसलेच नव्हते! बाम सर त्याच्याकडे माझे लक्ष वेधत होते. तेव्हा प्रथम मनात आले, रोज सकाळी जाग आल्यावर ‘आपण आज आनंदी आहोत का?’ हा प्रश्न कधी स्वतःला विचारतच नाही मी. तुम्ही विचारता? सकाळी-सकाळी आनंदाची भावना कधी अनुभवलीय? नसेलच. कारण आपण सगळेच बहुदा रोजच सकाळी उठल्यापासून आपण दुःखी असण्याची (किंवा आनंदात नसण्याची!) कारणे शोधतच असतो. रात्री झोप नीट/पुरेशी न झाल्याचे दुःख, सकाळी लवकर उठावे लागल्याचे, कालचे बरेच काम पेंडिंग राहिल्याचे, पुन्हा दिवसाचे रहाटगाडगे सुरू झाले त्याचे, काल कोणी तरी मारलेल्या टोमण्याला उत्तर न देता आल्याचे.... थोडक्यात काय, उगवलेल्या नव्या दिवशी आनंदी न होण्याचे हजारो बहाणे आपल्याला मिळतात. रोजच..!आपण आनंदी राहायचे की नाही, हा निर्णय आपल्या आयुष्यात कोण घेत असते? आपण सोडून सगळे! प्रत्यक्षात तो निर्णय घेण्याची जबाबदारी आपली असताना, आपण ती अशी परिस्थितीच्या किंवा कोणा तरी दुसऱ्याच माणसाच्या गळ्यात अडकवून मोकळे होतो आणि दुःखी राहू लागतो...! आता तर असे चेहरा पाडून खिन्न राहण्यासाठी किती तरी कारणे कोरोना नावाच्या संकटाने आपल्या हातात आयतीच ठेवली आहेत. या कारणांच्या मागे मोठ्या संकोचाने उभी असलेली आणखी एक गोष्ट मात्र आपल्याला दिसत नाहीये. ती आहे आपल्या सर्वांवर असलेली जबाबदारी. जे-जे म्हणून या तडाख्यातून वाचले आहेत, त्या प्रत्येकावर असलेली जबाबदारी. परिस्थितीने ती आपल्यावर टाकली आहे. आपल्या आसपास असलेल्या, जवळची माणसे गमावल्याच्या दुःखात आणि त्याचवेळी भविष्याबद्दल कमालीचे भय मनात असलेल्या लोकांना धीर देण्याची, त्यांच्या आयुष्यात छोटे-छोटे आनंद पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी. आपल्या जगण्याच्या जरा पलीकडे बघताना पावलोपावली अनेक माणसे प्रश्न घेऊन उभी असलेली आपल्याला दिसतील. त्यांच्याजागी कदाचित आपण पण असू शकलो असतो, हा विचार क्षणभर केला की, जे काही दिसते ते अनुभवले की, मग त्यांच्यासाठी करायच्या कितीतरी गोष्टी आपल्याला सुचू शकतील...! पण त्यांना जर आनंद द्यायचा असेल, तर तो आधी आपल्याकडे पाहिजे ना आणि त्यासाठी कोणत्याही कारणांची गरज नसते.आपल्यापुढे नेहमीच दोन पर्याय असतात, आनंदी राहणे आणि नसणे. आनंदी राहणे हा पर्याय एकदा जाणीवपूर्वक निवडला की, त्यासाठी आपल्याला किती तरी कारणे सापडू लागतात. माझ्या त्या शस्त्रक्रियेनंतर मी एक सवय स्वतःला लावून घेतली. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारते, आज मी आनंदी आहे? त्याचे काय कारण आहे? आकाशात आलेले काळे ढग, बागेत उमललेले एखादे फूल, कुठून तरी कानावर येत असलेले सुब्बलक्ष्मीनी गायिलेले स्तोत्र, फिरण्याच्या मैदानातील मऊ गवताच्या स्पर्शाची आठवण... अशा अनेक गोष्टी मला आठवू लागतात. हा प्रयोग दिवसाचा चेहरामोहराच बदलून टाकणारा असतो. उद्याच हा प्रयोग करून बघा, सांगा तुमचा अनुभव...! मला ऐकायला आवडेल.

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

टॅग्स :मानसिक आरोग्य