lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > लॉकडाऊन काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले! कुटुंबातील वाढते ताणतणाव कसे कमी होतील?

लॉकडाऊन काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले! कुटुंबातील वाढते ताणतणाव कसे कमी होतील?

टाळेबंदीच्या काळात घटस्फोटांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत पुण्यातील शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 03:36 PM2021-04-20T15:36:01+5:302021-04-20T16:26:44+5:30

टाळेबंदीच्या काळात घटस्फोटांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत पुण्यातील शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले.

What exactly happened to the husband and wife during the lockdown? What is the reason for the increasing number of divorces in the Corona period? | लॉकडाऊन काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले! कुटुंबातील वाढते ताणतणाव कसे कमी होतील?

लॉकडाऊन काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढले! कुटुंबातील वाढते ताणतणाव कसे कमी होतील?

Highlightsआपण ‘कुटुंबकेंद्रित’रचनेकडून ‘व्यक्तीकेंद्रित’ समाजरचनेकडे चाललो आहोत. मी, माझी प्रगती झाली पाहिजे. जो प्रवास 'आम्ही’ कडे व्हायला हवा होता तो ‘मी’ पणाकडे येऊन ठेपला आहे.ज्यावेळी जोडपी अपरिहार्यतेनं एकत्र आली, त्यावेळी ती एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरकाव करायला लागली. त्यांचं एक रूटीन डिस्टर्ब झालं. अवकाशाचा संकोच व्हायला लागला.एरवी मुलांमध्ये लक्ष न घालणारे आईवडील अचानक मुलांमध्ये लक्ष घालायला लागले. त्याचाही त्रास व्हायला लागला. विशेष म्हणजे, टाळेबंदीच्या काळात एकमेकांचे विवाहबाह्य संबंध खुले झाले.

-नम्रता फडणीस

घर हे दोघांचं असतं एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं सावरायचं असतं, असं नेहमी म्हटलं जातं. पण ही वाक्यं ऐकायला खूप सुंदर असली तरी इथे दुसऱ्यानं म्हणजे नेमकं कुणी? रूढार्थानं महिलेनेच का असे प्रश्न आता समोर येत आहेत. कोरोनाच्या या अवघड काळात, विशेषत: लॉकडाऊनमध्ये घरोघर काही नवे वाद उभे राहिल्याचे चित्र आहे. त्यातून काहीजण अगदी घटस्फोटापर्यंत ही पोहोचत आहेत. टाळेबंदीच्या काळात तर ही गोष्ट प्रकर्षानं समोर आली. टाळेबंदी खरंतंर कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची निवांत संधी होती. मात्र या संधीचं सोनं करण्याऐवजी अनेक जोडप्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याची परिणीती घटस्फोटांमध्ये होत त्याचीही संख्या वाढते आहे. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या काळात पुण्यातील शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यात परस्पर संमतीनं घटस्फोट घेण्यात आले.

हे असं का घडतंय?

नात्यांमध्ये इतकी कटुता का येऊ लागलीये याविषयी विवाह समुपदेशक लीना कुलकर्णी सांगातात, केवळ टाळेबंदीमध्येच नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्येच घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’रचनेकडून ‘व्यक्तीकेंद्रित’ समाजरचनेकडे चाललो आहोत. मी, माझी प्रगती झाली पाहिजे. जो प्रवास 'आम्ही’ कडे व्हायला हवा होता तो ‘मी’ पणाकडे येऊन ठेपला आहे. यातच माणसाला स्वीकरण्याची आणि सहन करण्याची क्षमता पूर्णपणे कमी झाली आहे. शेअरिंग देखील कमी झालंय. घरातील सुना किंवा तरूण मंडळी जेव्हा नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात. तेव्हा घरातील ज्येष्ठांनी स्वत:चं एक विश्व तयार केलेलं असतं. पण जेव्हा २४ तास एकमेकांबरोबर राहायची वेळ येते. तेव्हा त्यातील बारीक धागेदोरे समजून घेण्याची आणि सहन करण्याची क्षमताच कमी झाल्याचं पाहायला मिळतं. आपण जेव्हा ‘स्पेस’ असं म्हणतो, तेव्हा त्याची व्याख्या प्रत्येकाच्या मनात पक्की झालेली असते. ज्यावेळी जोडपी अपरिहार्यतेनं एकत्र आली, त्यावेळी ती एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरकाव करायला लागली. त्यांचं एक रूटीन डिस्टर्ब झालं. अवकाशाचा संकोच व्हायला लागला. एरवी मुलांमध्ये लक्ष न घालणारे आईवडील अचानक मुलांमध्ये लक्ष घालायला लागले. त्याचाही त्रास व्हायला लागला. विशेष म्हणजे, टाळेबंदीच्या काळात एकमेकांचे विवाहबाह्य संबंध खुले झाले. माझ्याकडे गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न झालेल्या तीन केसेस आल्या. लग्नानंतर लगेचच त्यांना टाळेबंदीचा सामना करावा लागला. तिन्हीही तरूणी करिअरीस्ट होत्या. त्या काळात त्यांना घरच्या कामाची सवय नसल्याचं कुटुंबाला कळून चुकलं. 'बघा, मला अगदी मोलकरीण बनून ठेवलं' असं त्यातली एक म्हणाली.

माझं निरीक्षण आणि त्यातून निर्माण झालेलं मत हे की, आत्ताची पिढी ‘मी हे करणार नाही? 'असं उद्धटपणे बोलून मोकळी होते.मी ऑफिसला गेले की या काय टीव्हीचं बघत बसतात ना? मग काम करायला काय प्रॉब्लेम आहे? अशी त्यांची भाषा असते. पण जसा तुम्हाला अवकाश असतो तसा त्यांना पण आहे. इतक्या क्षुल्लक कारणांवरून वादविवाद होऊ लागले आहेत. काही तरूणींना समुपदेशनातून हे पटतं. काही अजिबातच ऐकून घ्यायला तयार नसतात. आज जुळवून घेण्याची लवचिकता कमी झाली आहे. तरूणपिढीला जुळवणी आणि तडजोड यातला फरक समजून सांगितला पाहिजे. तसं झालं नाही? तर त्यातून विवाह विच्छेद हा अटळ आहे. संसाराचा रथ हा दोन चाकांवर चालतो . तो एकत्रितपणे चालण्यासाठी ‘मी’ पणाचा प्रवास ‘आम्ही’ पर्यंत नेण्याची गरज आहे!’

एकीकडे असं चित्र असताना जे घटस्फोटापर्यंत पोहोचलेले नाहीत त्याही अनेक घरात धुसफूस दिसते. कोरोनाच्या घरबंदीने अनेक नवे प्रश्नही अशा तऱ्हेने निर्माण केले आहेत.

काय व्हायला हवंय?

- एकमेकांशी पारदर्शी संवाद हवा.

- एकमेकांना निरपेक्षपणे स्वीकारण्याची वृत्ती हवी.

- एकमेकांवर विश्वास हवा.

- एकमेकांशी जुळवून घ्यायला हवं.

 

का होताहेत घटस्फोट?

- परस्परांचा अहंकार

- टाळेबंदीच्या काळात पगार कपात आणि नोकऱ्या गेल्यामुळे आलेलं नैराश्य, कुटुंबावर झालेला परिणाम

- घरात काम करण्यावरून सातत्यानं होणारं शीतयुद्ध

मित्र-मैत्रिणींना चॅटिंग करण्यावरून संशयाचं वातावरण

 

परस्पर संमतीने घटस्फोटात वाढ

गेल्या अडीच वर्षात परस्पर संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल आहेत. घटस्फोटाचे दावे दाखल झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांकडून जोडप्यांचं समुपदेशन केलं जातं. काही प्रकरणांमध्ये जोडप्यातील वाद मिटवून त्यांचा संसार पूर्ववत करण्यास यश मिळालं आहे!

-ॲड, वैशाली चांदणे, अध्यक्ष दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

 

 

 

Web Title: What exactly happened to the husband and wife during the lockdown? What is the reason for the increasing number of divorces in the Corona period?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.