Join us  

मनाची ताकद वाढवणारी लस! मनाच्या जखमा कशा बऱ्या करायच्या, त्याचं उत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 3:42 PM

जेव्हा परिस्थिती आपल्या हातातच नसते, जे घडतं आहे ते टाळता येत नाही, तेव्हा काय करायचं?

ठळक मुद्देमनापुढे हे चित्रण करताना त्याला आपल्या स्वसंवादाची जोड जरूर द्यावी.

वंदना अत्रे 

परिस्थितीने पाठीत हाणलेले रट्टे सोसल्यावरही ताठ उभे राहून दाखवण्याचा चमत्कार करणारे डॉ. व्हिक्टर फ्रांकेल हे मानवी इतिहासातील एक अलौकिक उदाहरण आहे. शारीरिक-मानसिक छळाची परिसीमा म्हणजे नाझी छळछावणीत त्यांच्या वाट्याला आलेल्या नरकयातना. त्यातून ते निव्वळ वाचले नाहीत, त्यानंतर त्यातून मिळालेले धडे सांगणारे पुस्तक त्यांनी लिहिले. या काळात त्यांनी जपलेला एकच मंत्र होता, “छळ माझ्या शरीराचा होतोय, मनाचा नाही. माझ्या मनापर्यंत काय जाऊ द्यायचे ते मी ठरवणार!”शरीराच्या वाट्याला आलेला अमानुष छळ त्यांनी आपल्या मनापर्यंत कधीच जाऊ दिला नाही..!या महामारीने आपल्याला काय शिकवले? एक - आपली इच्छा असो वा नसो, मनाविरुद्ध गोष्टी घडणारच आहेत. परिस्थिती सुधारण्याची वाट बघत बसलो तर वाट बघतच बसावे लागण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. आणि दोन - एखाद्या महामारीत विषाणूवर लस शोधता येते, मनाला होणाऱ्या जखमा आणि येणारी हताशा त्यावर लस शोधणे अवघड आहे. आपली लसआपल्यालाच निर्माण करून घेत राहायची आहे.

ती कशी मिळवता येते?

1. पहिली बाब म्हणजे, जेव्हा प्रत्येकच गोष्ट चुकीची घडत असते तेव्हा आपण एका गोष्टीवर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवू शकतो आणि ती म्हणजे, या चुकीच्या गोष्टीला आपण देत असलेला प्रतिसाद!2. या काळात जर आपण फक्त नकारात्मक, वाईट गोष्टींवरच लक्ष ठेवले तर चांगली कामगिरी करण्याची आपली इच्छाच क्षीण होऊ लागते. आणि त्यातून होणारी चिडचिड, नाराजी, राग या भावना आपल्याला नको त्या मार्गाला घेऊन जातात.3. कोणत्याही आव्हानाच्या काळात कोणती गोष्ट सर्वांत प्रथम करावी? - तर कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत त्याची यादी करणे, करीत राहणे. गरज असल्यास हे कागदावरसुद्धा लिहून काढावे.4. गोष्टी कागदावर आल्या की लढण्याच्या रणांगणाचा पूर्ण आराखडा आपल्या समोर येतो. हा आराखडा बघताना रोज स्वतःला एका मंत्राचे स्मरण द्यायचे, “जेते कधीही पळून जात नाहीत आणि पळपुटे लोक कधीही जिंकत नाहीत.”5. जेते आणि रणांगण ही भाषा भले युद्धाची वाटेल; पण आव्हान तगडे असेल आणि हिरिरीने हाताळायचे असेल तेव्हा ती भाषा का नाकारायची?6. अशा काळात संताप, भीती, दुःख, हताशा या भावना मनात आल्या की फुग्यातील हवा टाचणी लागून एकदम निघून जावी तशी आपल्या यंत्रणेत असलेली शक्ती जणू एकदम संपून जाते. आणि मग साध्या-साध्या गोष्टीसुद्धा अवघड वाटायला लागतात, जमेनाशा होतात.7. हे टाळण्यासाठी डॉ. फ्रांकेल काय करीत होते?- आपल्या पत्नीचे स्मितहास्य आठवत राहत आणिकैदेतून सुटका झाल्यावर तिची भेट होईल तेव्हा ती कशी हसेल ते सतत डोळ्यांपुढे आणत..!

व्हिजुअलायझेशन कसे कराल?

भारतीय योगशास्त्राने, भविष्यातील चित्रण किंवा visualisation करण्याची साधना सांगितली आहे.भूतकाळातील आपल्या एखाद्या उत्तम अनुभवाचे स्मरण करणे आणि भविष्यात तसेच उत्तम आपल्याला साधता येईल याचा विचार करीत त्याची दृश्ये मनापुढे आणणे म्हणजे चित्रण. मनापुढे हे चित्रण करताना त्याला आपल्या स्वसंवादाची जोड जरूर द्यावी. “मी जे काही बघते आहे तेच घडायला मला हवे आहे!” एवढा स्वसंवादसुद्धा पुरेसा आहे.भविष्याचे चित्रण करताना त्यामधील दूरचे टप्पे आणि जवळचे उद्दिष्ट असे आपण बघू शकलो, त्यासाठी आत्ता काय करायचे त्याची आखणी करू शकलो तर आपल्या आंतरिक शक्तीला आपल्या प्रयत्नांची दिशा स्पष्ट होते. मन त्यावरच एकाग्र होऊन सर्व शक्तीनिशी ते चित्रण प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करू लागते.आपले प्रतिसाद योग्य येऊ लागतात. हे चित्रण करताना मनात ध्यास दूरच्या भविष्याचा; पण वारंवार चित्रण मात्र जवळच्या उद्दिष्टाचे करीत राहिलो तर स्वतःवरील विश्वास दृढ होत जातो.

टॅग्स :मानसिक आरोग्य