डॉ. ज्योत्स्ना पडळकर
आईनं अंगावरचे दूध बाळाला पाजणं हाच नैसर्गिक नियम असताना हळूहळू ही पाजण्याची ऊर्मी कमी का होत गेली? बाळाला पाजायला बाटली कधीपासून सर्रास अस्तित्वात आली? हे फार पूर्वी झालं नाही फार तर एक शतक मागे. याची सुरुवात परदेशात झाली. आपल्यातल्या काही उच्चभ्रू परदेशात थोडा काळ वास्तव्य केलेल्यांनी आणि परदेशातल्या हरेक गोष्टीचं कौतुक वाटणाऱ्या मंडळींनी हे लोण आपल्याकडे पसरवलं. समाजातल्या उच्चवर्णीयांनी आणि श्रीमंत मंडळींनी ही कल्पना उचलून धरल्यानं साहजिकच ती प्रतिष्ठा पावली आणि अनुकरणीय होत गेली. कोणतीही नवी गोष्ट समाजात चटकन पसरते आणि सोयीची वाटली तर उचललीही जाते. जोपर्यंत त्या नव्या बदलामुळे काही खास तोटे होत आहेत असं लक्षात येत नाही किंवा पटत नाही तोवर हा बदल सर्वांच्या मनात घर करून राहतो त्याला सहज काढून टाकणं अवघड होतं तसंच या बाटलीचं आणि वरच्या दुधाच्या पावडरींचं झालं.
(Image : google) आपल्याकडेही गावाकडच्या लोकांनी व्यवसायासाठी, पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घेतली होती. शहरात औद्योगिक वसाहती वाढत होत्या. स्त्रियांनाही त्यात सामावून घेतलं जात होतं. इतरही नोकरीच्या संधी स्त्रियांना मोकळ्या होत होत्या. ऑफिसेस बँका शाळा इत्यादी ठिकाणी कित्येक स्त्रिया कामाला लागल्या होत्या. तिच्या मिळवतेपणाचे फायदेही दिसू लागले होते. सहाजिकच या मिळवतीचं सामाजिक स्थानही उंचावलेलं दिसत होतं. अशावेळी या शहरातल्या विभक्त छोट्या कुटुंबाच्या वास्तव्यात कोणी वडीलधारं सल्लागार नसणं, मुलांच्या सांभाळासाठी कोणाचा आधार नसणं आणि अर्थार्जनाची गरज मात्र वाढलेली असणं झालं होतं. अशावेळी मुलांना वरचं दूध दिलं तर चालतं, या कामासाठी बाटली वापरली तर फार सोपं पडतं आणि आईनं बाळाच्या जवळ नसलं तरी चालतं अशी सोपी संकल्पना पर्याय म्हणून सापडली. साहजिकच तिच्याकडे या स्त्रिया आकर्षित झाल्या यात काय आश्चर्य? त्यातच तिला नव्या अडचणींनाही तोंड द्यावं लागू लागलं. बाळाला अंगावर पाजण्यासाठी जी मोकळीक लागते, एकांत लागतो, सवड लागते ती कमी पडू लागली. चारचौघात पाजायची लाज वाटणं, नेसत्या कपड्यांची अडचण वाटणं अशा गोष्टींमुळं सामाजिक दडपण येऊ लागलं. कामाच्या ठिकाणी बाळाच्या सांभाळाची सोय नसणं, तिथं बाळाला पाजायची चांगली सोय नसणं यामुळं बाळाला पाजण्यावर आपोआपच बंधनं येत गेली.अशावेळी खरंतर संभाव्य धोक्यांची जाणीव डॉक्टरांनी आणि सरकारनी या स्त्रियांच्या मनावर ठसवायला हवी होती. पण तसं झालं नाही दुधाच्या पावडरी करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या मालाची विक्री उत्तम व्हावी यासाठी भडक जाहिरात तंत्र वापरलं आणि ते यशस्वी झालं. त्यांच्या या विक्रीवर कोणाचाही अंकुश नव्हता. क्वचित मोठ्या वैद्यकीय संस्थांमार्फतही असे डबे वापरले गेले आणि नकळत त्यांची आणखीच जाहिरात झाली. डॉक्टरांनाही त्यांनी आपल्या जाळ्यात ओढायला कमी केलं नाही. आर्थिक मदती, आकर्षक सवलती, भेटवस्तू देऊन त्यांनी त्यांच्या मालाची विक्री वाढवली. प्रसूती गृहापासूनच गोंधळून टाकणारे सल्ले मिळाले. डॉक्टरांकडून जे स्तनपानाचं महत्त्व सांगणारे सल्ले, मार्गदर्शन मिळायला हवं ते कमी पडलं आणि दुधाच्या पावडरींचं उत्पादन करणाऱ्या देशी परदेशी कंपन्यांनी मात्र आपला कार्यभाग साधला. दुधाच्या पावडरींवर पोसलेल्या गुटगुटीत बाळांची चित्रं दाखवून सफाईदारपणे त्यांच्या दुधाची माहिती सांगून या नव्या आयांना भुलवून टाकलं. त्यांना स्तनपानापासून परावृत्त करायला हे एक मोठंच कारण ठरलं. हे नवं दूध या कंपन्यांना बाळांच्या "गळी उतरवायला" फारच सोपं झालं. त्यांचे मोठे फायदे होत गेले पण आपल्याला आपले तोटे समजून यायला फार दिवस लागले.आईच्या अर्थार्जनातून बाळाचं वरचं दूध, त्याचा खर्च, त्याच्या बाटल्यांची स्वच्छता आणि ती नीट न झाल्यामुळं होणारे आजार, या आजारांवर होणारा खर्च यांची तोंड मिळवणी होणं कठीण जाऊ लागलं. त्यातून कुटुंबाचं विशेषतः आईचं कुपोषण होऊ लागलं. आईचं कुपोषण, तिची दमणूक, बाळाचं वरचं दूध पिणं,त्याचे आजार,त्याचं कुपोषण आणि मग बालमृत्यू असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न पाश्चात्य देशात इतक्या तीव्रतेनं जाणवले नव्हते, याचं कारण तिथली स्वच्छता, लोकांचं शिक्षण. त्यांची आरोग्य सेवेची पातळी आपल्या तुलनेत कितीतरी सरस आहे आणि हवामान चांगलं असल्यानं आजारांचं प्रमाणही कमी आहे.आपल्या देशात डब्याचं दूध- बाटली ही चैन कोणत्याही दृष्टीनी आपल्याला परवडण्यासारखी नाही हे हळूहळू लक्षात येऊ लागलं.सगळ्या प्रश्नांचं मूळ स्तनपानाची कमतरता असल्याचं पटलं. मग मात्र हे सगळे दुष्परिणाम लक्षात येताच बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेनं सरकारच्या मार्फत कायदा केला.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ आहेत.)
jyotsnapadalkar@gmail.com
(स्तनपानाचे महत्त्व सांगणारी विशेष लेखमाला आजपासून रोज वाचा खास लोकमत सखी.कॉमवर)