डॉ. ऐश्वर्या रेवडकर
दर दोनेक दिवसातून मला एक तरी फोन कॉल किंवा पर्सनल मेसेज येतो, गर्भपाताच्या गोळ्या विचारण्यासाठी. ज्या व्यक्तीसाठी त्या हव्या असतात, ती कुठेतरी अमुक ठिकाणी असते, जी व्यक्ती फोन करतेय ती तमुक ठिकाणी असते आणि मी आणखी तिसऱ्याच अमक्या ढमक्या ठिकाणी. मला अगदी जुजबी, कमीत कमी माहिती पुरवली जाते की, ‘अमक्या तारखेला शेवटची पाळी आली होती. आज घरी कीटने तपासले तर टेस्ट पॉझिटिव्ह आली, सध्या इतक्यात बाळ नको आहे, तर गर्भपाताच्या गोळ्या सांगा. आम्ही त्या दुकानातून घेऊन देऊ, घरीच सर्व करू.’ इतके सहज सोपे वाटते सर्वाना हे ! दुकानात जाऊन चणे फुटाणे घ्यावेत इतके सहजतेने विचारतात लोक. यामध्ये सर्व प्रकारचे लोक येतात, शहरी व ग्रामीण, शिक्षित व अशिक्षित, विवाहित किंवा अविवाहित. कधी मुलीचा नातेवाईक फोन करतो तर कधी मुलीच्या बॉयफ्रेंडचा मित्र (कारण त्या दोघांना लाज वाटते बोलायला). कधी तर कोणी फेसबुकवरून पण मेसेज करतात, इमर्जन्सी म्हणून. अशा सर्वच लोकांना पाहून आश्चर्यही वाटते आणि चिंताही.
गर्भावस्था नॉर्मल आहे की अशी एक्टोपिक आहे, हे कसे समजते ?
१. युरीन प्रेग्नसी कीट ने फक्त स्त्री गर्भवती आहे एवढेच समजते. बाकी ज्यादाची माहिती त्यातून समजत नाही. २. आम्ही स्त्रीच्या योनीतून दोन बोटांनी जी तपासणी करतो , (पर व्हजायनल एक्झामिनेशन ) त्यातूनही हे काही प्रमाणात समजू शकते. ३. सोनोग्राफीमधून खात्रीशीर माहिती कळते. ४. रुग्णाच्या विशेष रक्त तपासणीद्वारे (बीटा एचसीजी होर्मोन लेव्हल ) हे समजू शकते, परंतु ही विशेष तपासणी सर्वच रुग्णालयात उपलब्ध असेल असे नाही. (खासकरून ग्रामीण भागात उपलब्ध नाही.) ५. तसेच गर्भवती स्त्रीला जर पोटात अचानक दुखू लागले आणि योनिद्वारे रक्तस्त्राव सुरु झाला, तर तेव्हा रुग्णाची सामान्य तपासणी करताना, ही ‘गुंतागुंत निर्माण झालेली एक्टोपिक गर्भावस्था’ आहे हे आमच्या लक्षात येते.
यावर उपचार काय ?
तर अशी गर्भावस्था वेळीच म्हणजे, गर्भ आकाराने आणि दिवसांनीही लहान असताना, गुंतागुंत निर्माण झालेली नसताना ओळखली गेली तर आणि रुग्णाच्या रक्त चाचण्या ठीक असतील तर विशेष औषधे देऊन उपचार करता येऊ शकतात. परंतु जर गुंतागुंत निर्माण झाली असेल, आकार मोठा असेल, तर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय राहतो. त्यातही अनेकदा काही तासांच्या आतच शस्त्रक्रिया झाली तरच रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. आता एवढे मोठे पुराण मी का सांगत बसले ? तर रुग्णाची तपासणी न करता, फोनवरूनच मी जर गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि चुकून एखादीचा गर्भ एक्टोपिक असेल, तर तो पोटातच फुटून महिलेचा जीव जाऊ शकतो.
(मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर स्त्रीरोग तज्ज्ञ असून सध्या छत्तीसगड येथील दुर्गम भागात रुग्णसेवा बजावत आहेत. फेमिनिस्ट, ट्रॅव्हलर, लेखिकाही त्या आहेत. अलीकडेच त्यांच्या ‘बिजापूर डायरी’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.)