Join us   

तिशीच्या आत पहिले मूल, काय सांगतेय यासंदर्भातले संशोधन, कुणाला धोका आणि काय फायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 7:38 PM

शिक्षण आणि करिअर ही आज बहुतांश मुलींची प्रायोरिटी झाली आहे. त्यानंतरच अनेकजणी लग्नाचा विचार करतात. पण करिअरच्या मागे पळताना आपल्या हातून काही सुटून तर जात नाही ना, याचा विचार नव्या पिढीने करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळेच तर तिशीची चाहूल लागली, की या काही गोष्टींचा विचार आवर्जून करा.

ठळक मुद्दे साधारण १५ ते २० वर्षांपुर्वी १०० जोडप्यांपैकी एखाद्या जोडप्यामध्येच गर्भ राहण्यासंबंधीच्या अडचणी दिसून यायच्या. आता हेे प्रमाण खूप वाढले असून दर २० ते २५ जोडप्यांमधील एक जोडपे गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे महिलांनी तिशीच्या आत एक अपत्य होऊ दिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

लग्नासाठी एखादी मुलगी तयार नसली तर ''अगं तुझ्या वयात असताना तर आम्ही दोन दोन मुलांना जन्मही दिला होता'', असे एखादे वाक्य तिला तिच्या जवळच्या स्त्री वर्गाकडून हमखास ऐकावे लागते. ज्या वयात या मुलीचे आज लग्नही झालेले नसते, त्या वयात असताना मागच्या पिढीने मातृत्वाचा अनुभवही घेतलेला होता. हाच तर जनरेशन गॅप आहे. पुर्वी लग्नही लवकर व्हायची  आणि लग्नानंतर  लगेचच मुलेही होऊ दिली जायची. आता मात्र वाढते वय अनेक समस्यांचे कारण ठरत आहे.

 

तिशीच्या आत पहिले बाळ का होणे गरजेचे आहे ?

१. बदललेली जीवनशैली आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे हा नव्या युगाचा जणू मंत्र झाला आहे. याशिवाय आठवड्यातून एक दोनदा जंकफुड खाल्ले जाते, कोल्ड्रिंकचे प्रमाणही वाढले आहे. अनेक जणांना व्यायाम करण्याची सवय नाही. यासगळ्या गोष्टी आरोग्याला हानिकारक असून या सगळ्या गोष्टींचा परिणामही पाळणा लांबण्यावर होत आहे.

 

२. स्ट्रेस आणि डिप्रेशन आजच्या धावपळीच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला गळेकापू स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे साहजिकच आजची पिढी स्ट्रेस आणि डिप्रेशनमध्ये असते. हा वाढता मानसिक त्रास शरिरातील हार्मोन्सचे संतूलन बिघडवणारा असतो. वाढत्या वयासोबतच ही गोष्ट प्रजनन क्षमतेवरही परिणाम करत जाते.

३. स्त्री बीजाची गुणवत्ता खराब होत जाते ३२ वर्षांपर्यंत स्त्री बीजाची गुणवत्ता चांगली असते. त्यानंतर मात्र ती कमी होत जाते. त्यामुळे तिशी उलटल्यानंतर पहिले बाळ होऊ देण्याचा विचार करणाऱ्या दाम्पत्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी. स्त्रीबीजाची गुणवत्ता खराब होत गेली, तर एकतर गर्भ राहण्यातच अडचण येते किंवा गर्भ राहिला तरी गर्भपाताचा धोका संभवतो. 

 

४. उपचाराला राहतात कमी संधी तिशीच्या नंतर जर प्रयत्न करूनही नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसेल, तर अनेक जाेडपी दोन- तीन वर्षे ट्राय करण्यात घालवितात आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जातात. यामध्ये बराच वेळ निघून जातो आणि मग वाढत्या वयानुसार शरीर उपचारांना साथ देत नाही. त्यामुळे डॉक्टरांनाही मग विशेष प्रयत्न आणि वेगवेगळ्या उपचारपद्धती अवलंबाव्या लागतात. त्यामुळे उपचाराला संधी राहील, अशा वयात तरी रूग्णांनी दवाखान्यात आले पाहिजे. 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिला