Join us   

मासिक पाळी आणि मनाचे आजार : हार्मोनल बदलांमुळे महिलांना मनाचे आजारही छळतात पण बोलायची सोय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 1:55 PM

मानसिक पाळीतल्या शारीरिक त्रासांसाठी डॉक्टरांकडे जात नाही, तिथं मनाच्या आजारांचा कोण विचार करतं, मात्र बोला, मदत मागा.

ठळक मुद्दे शरीरात, मनात वेगवेगळे बदल होतात. चिडचिड वाढते मानसिक स्वास्थ्यही बिघडते. असे का होते हे कुणालाही सांगता येत नाही.

रेशमा कचरे

आपल्या समाजात अजूनही मासिक पाळी म्हणजे काहीतरी अमंगल किंवा अपवित्र असं मानलं जातं. मासिक पाळीमागील खरं कारण माहीत नसल्यामुळे मासिक पाळी आलेल्या स्त्रीला अमंगल समजलं जातं. कित्येक वर्षं 'विटाळ' मानला गेलेला हा विषय पुरुष तर टाळतातच. पुर्वी बाई विटाळशी असली की तिला कावळा शिवलाय असे म्हणून तिला चार दिवसांसाठी अस्पृश्य ठरवली जात असे म्हणजेच वेगळ बसविले जात असे शिवाय तिला आराम करण्याऐवजी अधिक काम ही करुन घेतली जात असत. खरं तर विटाळ म्हणजेच एक अंधश्रध्दा आहे. निसर्गनिर्मित जी गोष्ट आहे, जी शारीरिकदृष्ट्या महत्वाची आहे,  तिला केवळ  मानवनिर्मित प्रथांमुळे विटाळ म्हंटलं जातं. बायकांना शारिरीक त्रासाला सामोरे जावचं लागतंच पण अशा वेळी दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे त्यांचं मानसिक खच्चीकरणही होतं. त्यातून त्यांना मानसिक त्रास, ताण, आजार यांनाही सामोरे जावे लागते याचा तर कुणी विचारच करत नाही. मासिक पाळी म्हणजे कुठलाही आजार, पाप, शाप किंवा कलंक नसून ही एक नैसर्गीक गोष्ट आहे. "मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिण्याला जो रक्तस्त्राव होतो त्याला मासिक पाळी म्हणतात".जे गर्भधारणा झाली तर बाळाच्या वाढीसाठी खुप उपयुक्त असते.पण अज्ञान व मनातील न्युनगंड बाजूला सारुन, लाज न बाळगता त्याबाबत आई व डाॅक्टरांकडू अधिक व शास्त्रीय माहिती घेणे गरजेचे आहे. शेवटी प्रश्न आरोग्याचा आहे. मासिक पाळी म्हणजे विटाळ नसून आपल्या शरीरात होणारा एक बदल आहे, तिचा सकारात्मतेने स्वीकार करणं म्हणजेच आपले आरोग्य उत्तम असणं. मासिक पाळी ही स्त्रियांच्या लैंगिकतेमध्ये, पाळी येण्यापूर्वी, पुनरुत्पादन प्रक्रियेत,बाळंतपण झाल्यानंतर आणि रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांच्या मानसिक आरोग्यामध्येही बदल होत असतात. ते बदल योग्य प्रकारे हाताळले गेले पाहिजेत.

 मासिक पाळीच्या तीन टप्प्यामध्ये स्त्रियांचे मानसिक आरोग्य हे धोक्यात येऊ शकते. १) दर महिन्याला मासिक पाळी सुरु होण्याआधी २)पुनरुत्पादन प्रक्रियेत (बाळंतपण झाल्यानंतर) ३)रजोनिवृत्तीच्या काळात. दर महिन्याला मासिक पाळी सुरु होण्याआधी स्त्रीच्या शरीरात भरपुर हार्मोनल बद्दल होत असतात, ज्यांचा शारिरीक, मानसिक परिणाम स्त्रीवर होत असतो.  मासिक पाळीच्या आधी सर्वसाधारणपणे एक आठवडा आधी काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. १.काही जणींना सतत खात राहण्याची इच्छा होते. २. काहीजणींमध्ये मूड बदलतो.  ३. स्तन दुखू लागतात. ४. सतत रडू येते. ५. शरीरात तीव्र वेदनांचा होतात. ६. कंटाळा,थकवा येतो.  ७. शरीर बोजड वाटते.  ८. चिडचिड वाढते. ९. निरुत्साही वाटते.  १०. झोपेचा त्रास होतो.

प्रत्येक स्त्रीनुसार ही लक्षणे बदलत असतात. हा त्रास हे आजाराचे लक्षण आहे हे माहित नसल्याने त्याचा त्रास वर्षानुवर्ष सहन केला जातो या स्थितीला नियंत्रणात आणले नाही तर स्त्रियांना नैराश्याचा आजार होतो. या लक्षणांवर उपचार करण्यासाठी योग्य प्रकारची वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते. मासिक पाळी येण्यापूर्वी दिसणारी ही लक्षणे तीव्र स्वरूपाची असतील तर स्त्रियांच्या कामावरही त्याचा परिणाम होतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत (बाळंतपण झाल्यानंतर) बाळांतपणानंतर काही काळ मासिक पाळीत खंड पडतो. यावेळी हार्मोन्सचे प्रमाण बदललेले असते. त्यामुळे स्त्रियांच्या स्वभावामध्ये बदल होतो. त्या घुम्या होतात . चिडचिड्या होतात. अनेकींमध्ये निद्रानाशाची समस्या जाणवतात. ८५ टक्के महिलांमध्ये ही लक्षणे ताप्तुरत्या स्वरुपाची असतात. १० टक्के महिलांमध्ये या लक्षणांसाठी विशेष उपचार घ्यावे लागतात. पुष्कळदा हे उपचार वर्षभर चालतात. बाळ जन्माला आल्यानंतर जीवनशैलीमध्येही फरक पडतो. झोपेचे प्रमाण कमी होते. सतत थकवाही येतो. काळजी घेणारे कुणी नसेल तर प्रकृतीच्या अन्य समस्याही वाढतात. प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यामध्ये मानसिक दृष्ट्या सक्षम नसलेली, नैराश्यग्रस्त महिला स्वतःसह बाळाचीही काळजी घेऊ शकत नाही. इत्यादी लक्षण दिसतात. परंतु योग्य उपचारानंतर ही लक्षणे कमी होऊ शकतात. मासिक पाळी, बाळ जन्माला घालणं, त्याला दुध पाजंण याचे जे वरदान निसर्गाने स्त्रीयांना दिले, सृजनाची शक्ती दिली त्याबद्दल खरोखरचं स्त्रीयांना अभिमान वाटला पाहिजे, कारण आपण नवनिर्मिती करतोय आणि याच सकारात्मकतेमुळे स्त्रियांची मानसिकता बदलते. रजोनिवृत्तीच्या काळात रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी थांबते, मात्र ती थांबण्यापूर्वी सहा ते आठ महिन्याचा कालावधी कमी अधिक फरकाने स्त्रियांसाठी आव्हानात्मक असतो. शरीरात, मनात वेगवेगळे बदल होतात. चिडचिड वाढते मानसिक स्वास्थ्यही बिघडते. असे का होते हे कुणालाही सांगता येत नाही. आहार, व्यायामाचा अभाव असेल तर अशा स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक असतो. हा त्रास असह्य होत असेल तर सर्व प्रथम स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवले जाते व ब-याचदा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची गरज भासू लागते. 

( लेखिका मानसिक आरोग्यासाठी जनजागृती करणाऱ्या परिवर्तन संस्थेत लेखिका समुपदेशक आहेत. मानसिक आधार आणि आत्महत्या प्रतिबंध मनोबल हेल्पलाईन  ७४१२०४०३०० येथेही तुम्ही मदतीसाठी संपर्क साधू शकता. www.parivartantrust.in

टॅग्स : मासिक पाळीचा दिवसमानसिक आरोग्य