lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पचन बिघडलं आहे हे सांगणारी 5 लक्षणं; दुर्लक्ष टाळा 10 पथ्यं पाळा! पेट सलामत तो..

पचन बिघडलं आहे हे सांगणारी 5 लक्षणं; दुर्लक्ष टाळा 10 पथ्यं पाळा! पेट सलामत तो..

पचन नीट होत नसेल तर आपलं शरीर तसं आपल्याला सांगत असतं. शरीराच्या या सांगण्याकडे दुर्लक्ष होणं म्हणजेच पचनाकडे दुर्लक्ष होणं. पचनाकडे लक्ष देणं म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 04:57 PM2021-10-02T16:57:39+5:302021-10-02T17:06:38+5:30

पचन नीट होत नसेल तर आपलं शरीर तसं आपल्याला सांगत असतं. शरीराच्या या सांगण्याकडे दुर्लक्ष होणं म्हणजेच पचनाकडे दुर्लक्ष होणं. पचनाकडे लक्ष देणं म्हणजे काय?

5 symptoms that indicate indigestion; Avoid Ignorance Follow 10 rules! | पचन बिघडलं आहे हे सांगणारी 5 लक्षणं; दुर्लक्ष टाळा 10 पथ्यं पाळा! पेट सलामत तो..

पचन बिघडलं आहे हे सांगणारी 5 लक्षणं; दुर्लक्ष टाळा 10 पथ्यं पाळा! पेट सलामत तो..

Highlightsअन्न पचन जर नीट झालं नाही तर शरीराचं पोषणही नीट होत नाही . शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. पचनाकडे लक्ष देण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या , एक अपचनाचे शरीर देत असलेले संकेत ओळखणे आणि दोन पचन क्रियेत बाधा येणार नाही याप्रमाणे आपला आहार विहार ठेवणे आवश्यक आहे.जेव्हा खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होत नाही तेव्हा निर्माण झालेल्या अँसिडमुळे पोटाच्या वरच्या भागात जळजळ व्हायला लागते.

आरोग्य चांगलं राहाण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. पण चांगल्या आरोग्यासाठी केवळ एवढंच पुरेसं नसतं. खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होऊन , अन्नातले अन्नघटक पचनक्रियेद्वारे शरीरात शोषले जाणं आवश्यक असतं. अन्न पचन जर नीट झालं नाही तर शरीराचं पोषणही नीट होत नाही . शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पचन बिघडलं ही साधी समस्या नाही. पचन तेव्हाच बिघडतं जेव्हा शरीरातील पचनाशी निगडित क्रिया सुरळीत होत नाही. पचन नीट झालं नाही तर भूक न लागणं, थकवा, पोट जड होणं, पोट फुगणं यासारख्या समस्याही जाणवायला लागतात. या समस्या केवळ आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट न झाल्यानं उद्भवतात. खाण्याला आपण जितकं महत्त्वं देतो तितकंच लक्ष अन्नाचं नीट पचन होतंय की नाही याकडेही असलं पाहिजे. त्यासाठी पचन क्रियेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Image: Google

पचनक्रिया तर पोटाच्या आत घडते त्यामुळे ते नीट होत नसेल तर आपल्याला कसं कळेल? पचन नीट होतंय की नाही याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं असे प्रश्न पडतात. पचन नीट होत नसेल तर आपलं शरीर तसं आपल्याला सांगत असतं. शरीराच्या या सांगण्याकडे दुर्लक्ष होणं म्हणजेच पचनाकडे दुर्लक्ष होणं. भूक कमी लागतेय, थोडं खाल्लं तरी पोट जड पडून अस्वस्थ व्हायला होतंय, डोकं दुखणं यासारख्या गोष्टीतून शरीर अपचनाचे संकेत देत असतं. त्याकडे लक्ष देवून पचन नीट होण्यासाठी काळजी घेतली तरच आपण खाल्लेल्या पौष्टिक अन्नातील पोषक घटक पचन क्रियेद्वारे शरीराकडून शोषले जातील. पचन नीट झालं तरच अन्नांचं रुपांतर ऊर्जेत होईल. पचन नीट न झाल्यास शरीरात विषारी घटक निर्माण होतात. पचनाकडे लक्ष देण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या , एक अपचनाचे शरीर देत असलेले संकेत ओळखणे आणि दोन पचन क्रियेत बाधा येणार नाही याप्रमाणे आपला आहार विहार ठेवणे आवश्यक आहे.

Image: Google

पचन बिघडलंय कसं कळेल?

1. अनेकदा असं होतं की जेवण झालं की पोट जड वाटायला लागतं. जेवण होवून भरपूर वेळ झाला तरी पोट जडंच राहातं. हा त्रास आपल्याला आपली पचन क्रिया बिघडल्याचं सांगते. तसेच काहींना जेवणाआधीच किंवा अर्ध जेवण झाल्यावरच पोट जड वाटायला लागतं. याचं कारण आरोग्य तज्ज्ञ सांगतात की आधी खाल्लेलं नीट पचलं नसल्यानं पुन्हा खाताना हा त्रास होतो. ही समस्या वारंवार जाणवत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

2. जेव्हा खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होत नाही तेव्हा निर्माण झालेल्या अँसिडमुळे पोटाच्या वरच्या भागात जळजळ व्हायला लागते. छाती आणि नाभीच्या मधल्या भागात जळजळ होणं , अस्वस्थ वाटणं हे खराब पचनाची लक्षणं आहेत. पचन नीट होण्यासाठी अन्न पचवणारे विकर पुरेसे निर्माण व्हावे लागतात, ते निर्माण झाले नाही तर मग पचन क्रिया नीट होत नाही, पोटात अँसिडची निर्मिती होवून छातीत, पोटात जळजळ होते.

3. खाल्ल्यानंतर ढेकर येणं किंवा पोटात निर्माण झालेला वायू गॅसेसद्वारे बाहेर पडणं ही नैसर्गिक क्रिया आहे. पण आंबट ढेकर येणं, पोटात सतत गॅस होणं हे अपचनाचे संकेत आहेत. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन पचन व्यवस्थेद्वारे नीट झालं नाही तर या समस्या निर्माण होतात.

4. खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन झालं नाही आणि हे सतत होत असल्यास मळमळ होणं, उलटी होणं या समस्याही जाणवायला लागतात. या लक्षणांकडे झालं असेल असं चुकीचं काही खाल्ल्यामुळे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता लगेच उपचार घेणं आवश्यक आहे.

5. पचन व्यवस्था नीट काम करत नसेल तर साहजिकच आपण जे काही खाऊ ते नीट पचत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम भुकेवरही व्हायला लागतो. झोपेचा जसा प्रत्येक व्यक्तीचा पॅटर्न असतो तसाच भुकेचाही असतो. म्हणजे अमूक वेळी जशी कोणाला झोप लागते तसे भुकेच्या वेळाही ठरलेल्या असतात. अपचनामुळे या भूक पॅटर्नवर परिणाम होतो. भुकेच्या वेळेस भूक लागतच नाही. केवळ रोज यावेळेला आपण नाश्ता करतो, दुपारचं जेवतो म्हणून खाल्लं जातं. पण खाताना त्यात रस वाटत नाही. ही अपचनाचीच लक्षणं आहेत.

Image: Google

पचन सुधारण्यासाठी

पचन क्रिया सुधारुन त्यासंबंधीच्या समस्या दूर होण्यासाठी आहार विहार, जीवनशैली या प्रत्येक बाबतीत बदल करावा लागतो. पचन हे केवळ गोळ्या औषधं, काढे आणि चुर्णांनी सुधरत नाही. तज्ज्ञ सांगतात बिघडलेलं पचन सुधरण्यासाठी आपल्याल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी बदलाव्या लागतात. त्यासाठी काही नियम आणि पथ्यं पाळावी लागतात.

1. एकाचवेळी खूप खाऊ नये. थोडं थोडं असं दिवसातून तीन चार वेळा खावं.
2. अँसिडयुक्त आणि पचन व्यवस्थेवर वाईट परिणाम करणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
3. जेवल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नये.
4. खूप थंड पाणी पिल्यानेही पचन व्यवस्थेवर परिणाम होतो. पचन सुधरण्यासाठी, खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट होण्यासाठी जेवणानंतर कोमट पाणी प्यावं.
5. जेवताना, खाताना हळूहळू, जेवावं. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खायला हवा.
6. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, पॅकेज्ड फूड , फास्ट फूड खाऊ नये.
7. जेवणात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
8. रोज ठरलेल्या वेळी जेवण करावं.
9. अल्कोहोल युक्त पेयं आणि धूम्रपान टाळावं.
10. रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन तास आधी करावं.

Web Title: 5 symptoms that indicate indigestion; Avoid Ignorance Follow 10 rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.