Join us   

मूल होत नाही? आयुर्वेद सांगते, उत्तम संततीसाठी हव्यातच या ४ निरोगी गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 2:52 PM

अपत्य होत नाही आणि जोडीदारांपैकी एकात दोष आढळला तरी उपचार करताना अनेक गोष्टींचा विचार करून दोष निवारण करणं आवश्यक असतं.

ठळक मुद्दे श्रेष्ठ दर्जाच्या अपत्य प्राप्तीकरता, ‘सुप्रजानिर्मिती’ करता आयुर्वेदामधे उत्तम मार्गदर्शन केले आहे.

वैद्य विनीता बेंडाळे

अनपत्यतेच्या समस्येसाठी चिकित्सा घेण्याकरता ज्यावेळेला दवाखान्यामधे रुग्ण येतात तेव्हा सर्व प्रथम त्यांची सविस्तर वैद्यकीय माहिती (detailed case history) घेणे फार महत्त्वाचे असते. त्यामधे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून व्यक्तिनिष्ठ माहिती तर घेतली जातेच, त्याबरोबरच मागील वैद्यकीय इतिहास (Past Medical history) देखिल तितकीच महत्त्वाची असते. जीवनशैलीमधील सवयींची सखोल माहिती ही चिकित्सा सुरु करण्यापूर्वी अत्यंत आवश्यक असते. या सगळ्या गोष्टींचा विचार हा चिकित्सा योजनेसाठी फार महत्वपूर्ण असतो. तसेच दोन्ही जोडीदारांच्या आवश्यक तपासण्यांचा अभ्यासही महत्वाचा असतो. आवश्यकतेनुसार तपासण्या पुन्हा करणे किंवा नवीन तपासण्या कराव्या लागणे याचा निर्णयही घ्यावा लागतो.

काही वेळा दोघांपैकी एका अथवा दोन्ही जोडीदारांच्या तरासण्यांमधे काही दोष आढळून येतात, त्या अनुषंगाने चिकित्सेची दिशा ठरवणे सोपे जाते. असे असले, तरी आयुर्वेदाने गर्भधारणेसाठी आवश्यक ज्या चार घटकांची माहिती दिली आहे, ते चारही घटक हे चिकित्सेच्या विचारामधे अंतर्भूत करणे फार महत्त्वाचे ठरते. मागे या बद्दल सविस्तर माहिती (लेख क्रमांक २) दिली असल्याने येथे त्यांचा केवळ उल्लेख करत आहे. ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज असे ते चार घटक आहेत. स्त्री आणि पुरुष बीजांची प्रत, गर्भाशयातील आतील स्तर (Endometrium) गर्भधारणेसाठी अनुकूल असणे, गर्भाशयनलिकांमधील मार्ग मोकळा असणे, गर्भाशय आणि संबंधित अवयव येथिल वातावरण पुरुष बीजाच्या दृष्टिने अनुकूल असणे, स्त्रीबीज निर्मितीचा काळामधे गर्भधारणेकरता संबंध येण्याची आवश्यकता, दोन्ही जोडीदारांचे एकंदरीत शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य, त्यांच्या शरीरातील सूक्ष्म स्तरावरील चयापचय प्रक्रिया (Metabolism), दोघांचे वय, स्थौल्य, थायरॉइड, डायबिटिस यासारखे आजार, स्त्री आणि पुरुष प्रजनन संस्थांमधील अवयवांची रचना प्राकृत असणे, या आणि इतरही संबंधित बाबींचा समावेश या चार घटकांमधे होतो. याचा मतितार्थ हा आहे की आयुर्वेदाच्या दृष्टिने चिकित्सा करत असताना तपासण्यांनुसार ज्या घटकांमधे दोष दिसून आला आहे, सुधारणेला वाव आहे,त्यांच्याशी निगडीत चिकित्सा योजना तर केली जातेच, त्याव्यतिरिक्तही इतर घटकांचा विचार चिकित्सा योजना करताना आवश्य केला जातो.    उदाहरणार्थ स्त्रीबीजनिर्मितीची प्रक्रिया (ovuation) होण्यामधे अडचण येत आहे, केवळ एवढीच दिशा तपासण्यांवरून दिसते असेल, तर चिकित्सा योजना करताना ही गोष्ट निर्देशित केली जातेच, पण त्याव्यतिरिक्त योनीप्रदेश, गर्भाशय आणि संबंधित मार्गामधील वातावरण पुरुष बीजांसाठी अनुकूल असणे, गर्भाशयातील आतील स्तर (Endometrium) गर्भधारणेसाठी जास्तीत जास्त सक्षम असणे, शरीरातील चयापचय प्रक्रिया, मानसिक स्वास्थ्य हे घटक जास्तीत आरोग्यपूर्ण असण्याच्या दृष्टिनेही चिकित्सा योजना केली जाते जेणेकरून गर्भधारणेसाठी आवश्यक सर्व घटक अनुकूल( At their best) करण्याचा प्रयत्न केला जातो.  तसेच दोघांपैकी केवळ एका जोडीदाराच्या तपासण्यांमधे काही दोष निदर्शनास आले, तरी दुसऱ्या जोडीदाराच्या बाबतीतील गर्भधारणेशी संबंधित घटक हे जास्तीत जास्त पोषक/अनुकूल करण्याचा विचार हा ही चिकित्सा योजना करताना महत्त्वाचा ठरतो असं व्यवहारात दिसून येतं. विशेषत: ‘Unexplained infertility’ मधे ही विचारधारा विशेष उपयुक्त ठरताना दिसते. श्रेष्ठ दर्जाच्या अपत्य प्राप्तीकरता, ‘सुप्रजानिर्मिती’ करता आयुर्वेदामधे उत्तम मार्गदर्शन केले आहे. ते विचार हे अनपत्यतेची चिकित्सा करतानाही उपयुक्त ठरतात, दोन्ही जोडीदारांसाठी चिकित्सा योजना करताना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीही मदत होते.

 

(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे) ०२० २५४६५८८६, www.dyumnawomensclinic.com                                                  

टॅग्स : प्रेग्नंसीमहिला