जागावाटपाचा पेच, नाराजी अन् ठाकरे बंधूंचं मराठी कार्ड; महायुतीसाठी मुंबई जिंकणं किती कठीण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 20:17 IST2025-12-26T20:08:58+5:302025-12-26T20:17:16+5:30

BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीसमोर आव्हान उभे ठाकले आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दाव्यांमुळे पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये आतापर्यंत २०० जागांवर प्राथमिक सहमती झाल्याची चर्चा आहे, मात्र उर्वरित २७ जागांवरून तिढा कायम आहे.

सुरुवातीला १५० जागांची मागणी करणारा भाजप आता १२५ जागांवर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे समजते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना १०१ ते १२५ जागांसाठी आग्रही आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याने शिंदेसेना आणि भाजपने युतीसाठी स्पष्ट नकार दिला आहे. केवळ जागावाटपच नाही, तर ठाणे महानगरपालिकेच्या चर्चेत राष्ट्रवादीला डावलले जात असल्याचा आरोप प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित झाल्यामुळे नवाब मलिक यांना सोबत घेण्याबाबत भाजपने कडक आक्षेप घेतला आहे. यावरून भाजप आणि अजित पवार यांच्यात तणाव आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी नुकतीच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकत्र लढण्याचे संकेत दिले. दोन्ही भावांनी 'मराठी माणूस' या मुद्द्यावर जोर दिला असून, सत्ता आल्यास 'मराठी महापौर' देण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकसभा २०२४ च्या निकालांनुसार, गोवंडी, मानखुर्द, भायखळा आणि माहीम या मुस्लिम बहुल भागांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे बीएमसी निवडणुकीतही हा वर्ग उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल्यास महायुतीसाठी ती मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.

२०१७ मध्ये शिवसेना आणि भाजप युतीने निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट पडल्याने आणि अजित पवारांची तिसरी शक्ती सोबत असल्याने गणिते पूर्णपणे बदलली आहेत.