'...तर पक्षाला 'तो' चेहरा देण्याची गरज'; थोरातांची काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींना सूचना

By मुकेश चव्हाण | Published: January 6, 2021 09:24 AM2021-01-06T09:24:26+5:302021-01-06T11:23:38+5:30

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील हे मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचले असून पुढील दोन दिवस ते काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मंत्री, आमदारांशी पक्षसंघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत.

नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असावा, या संदर्भात काही निवडक नेत्यांची मतेही ते जाणून घेणार असल्याची सांगण्यात येत आहे.

दिल्लीला गेलेले सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुंबईत परतले असून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त बाळासाहेब थोरात यांनी फेटाळले आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष देण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या मुंबई भेटीला महत्त्व आले आहे.

एच के पाटील यांनी मंगळवारी (5 जानेवारी) रात्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोघांशी सह्याद्री गेस्टहाऊसवर स्वतंत्रपणे चर्चा केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत होणारी चर्चा काल चर्चा होऊ शकली नाही. ती आज सकाळी नऊ वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाळासाहेब थोरात यांनी या भेटीदरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी चांगला पर्याय शोधा, आम्ही पाठीशी राहू, असं प्रभारींना सांगितल्याचं समजतं. तसेच एबीपी माझाच्या वृत्तानूसार, जर बदल होणार असेल तर पक्षाला बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे, अशी महत्वाची सूचनाही बाळासाहेब थोरात यांनी प्रभारींच्या बैठकीत दिली.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले, ही बातमी आली कुठून? माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. तशी कुठलीही चर्चा नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तर पद सोडण्याची आपली तयारी आहे.

तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून खासदार राजीव सातव, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार आदी नावे चर्चेत आहेत. महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अशी तीन पदे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहेत.