CoronaVirus Mumbai Updates : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! उच्चभ्रू सोसायट्यांना कोरोनाचा विळखा तर झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग 10 टक्क्यांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:32 PM2021-04-20T12:32:36+5:302021-04-20T12:44:55+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. याच दरम्यान कोरोना संसर्गासंदर्भात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. याच दरम्यान कोरोना संसर्गासंदर्भात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने होत आहेत.

मुंबईतील सोसायट्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठ्या सोसायट्या आणि कॉलनीत राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वाधिक आहे. तर झोपडपट्ट्यांमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण सर्वात कमी आहे.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईत 87 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यातील 90 टक्के रुग्ण मुंबईच्या सोसायटी आणि कॉलनी आणि इतर परिसरातील आहेत. बाकी उरलेले दहा टक्के रुग्ण हे मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, मुंबईतील 79,032 रुग्ण नॉन स्लम परिसरातील आहे. तर 8411 रुग्ण मुंबईतील विविध भागातील आहेत. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला असून कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून धारावीकडे पाहिले जात आहे.

जुलै 2020 मध्ये 57 टक्के केसेस झोपडपट्ट्यांमध्ये पाहायला मिळाले होते. तर 16 टक्के केसेस नॉन स्लम एरियात होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येताच सर्व चित्रं बदलून गेलं आहे. आता सोसायट्यांमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सध्या 1169 बिल्डिंग सील आहेत. तर 10 हजार फ्लोअर सील झालेले आहेत. यात सर्वाधिक 20 लाख लोक राहतात. म्हणजे सुमारे 20 लाख लोक कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत.

ज्या इमारतीत पाचहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत त्या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुंबईत कठोर निर्बंधाच्या पाच दिवसांनंतर सोमवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. ही बाब मुंबईकरांना दिलासादायक आहे.

शहर, उपनगरात दिवसभरात 7 हजार 381 रुग्ण आणि 57 मृत्यूंची नोंद झाली. तर दिवसभरात 8 हजार 583 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 4 लाख 86 हजार 622 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या 106 आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1 हजार 171 आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील 28 हजार 654 अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

फेब्रुवारीपासून मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सध्या स्थिर असल्याचे चित्र आहे. हा ट्रेंड असाच राहिल्यास कोरोनाची लाट ओसरली असे गृहीत धरता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.

10 एप्रिल रोजी मुंबईत 9 हजार 327 इतके कोरोनाचे रुग्ण होते. 19 एप्रिलला ही संख्या 7381 एवढी कमी झाली. गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येत पुन्हा थोडी घट दिसून येत आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता कोरोनाची लाट सध्या स्थिर असल्याचे दिसून येत असल्याचा अंदाज काकाणी यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणि धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 लागू केलं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने काही निर्बंध अधिक कठोर केले आहेत. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढतच आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दर 3 मिनिटाला एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत असल्याची आणि एका तासात दोन हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read in English