CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! मुंबईमध्ये हात-पाय पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 50 वर्षांवरील लोकांवर करतोय अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:13 PM2022-06-28T18:13:23+5:302022-06-28T18:31:09+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचा प्रसार होत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,793 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 525047 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. पण अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटचा प्रसार होत आहे. राज्यात ओमायक्रॉन उप-प्रकार BA.4 आणि BA.5 च्या एकूण 49 प्रकरणांपैकी, 28 फक्त मुंबईत आहेत.

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या सेंट्रल लॅबोरेट्ररीमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत घेतलेल्या सर्व 364 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे प्रकार आढळून आले आहेत. तथापि, यापैकी 325 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन BA.2 आणि BA.238 आढळले आहेत.

शनिवारी राज्यात ओमायक्रॉन सब व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 ची एकूण 23 प्रकरणे नोंदवली गेली. संक्रमित रुग्णांपैकी एकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, 18-25 वयोगटातील दोन आणि 26-50 वयोगटातील नऊ रुग्ण आहेत.

सर्वात जास्त म्हणजे वृद्ध लोक या नवीन व्हेरिएंटच्या विळख्यात सापडले आहेत. एकूण 11 रुग्ण आहेत ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या या दोन नवीन प्रकारांची एकूण 49 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरिएंटच्या एकूण 49 प्रकरणांपैकी मुंबईत 28, पुण्यात 15, नागपूरमध्ये चार आणि ठाण्यात दोन प्रकरणं आढळून आली आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी महाराष्ट्रात एकूण 6493 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी पाच कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सर्वांवर मुंबईत उपचार करण्यात आले. यासह राज्यात एकूण 79,62,666 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

कोरोना महामारीमुळे मृतांची संख्या 1,47,905 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 24,608 कोविड-19 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 77,90,153 लोक त्यातून बरे झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा पुन्हा एकदा वेगाने प्रसार होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लोकांना मास्क लावण्याचं आवाहन हे तज्ज्ञांकडून केलं जात आहे. तसेच नियम न पाळल्यास ते महागात पडू शकतं असंही म्हटलं आहे.