मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:45 IST2025-10-28T08:44:31+5:302025-10-28T08:45:03+5:30
लोकसभेत मृत, मात्र विधानसभेत झाला पुनर्जन्म

मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
मुंबई : एकट्या वरळी विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तेव्हा २० हजारांहून अधिक मतदार संशयास्पद असल्याचे दिसून आले. ही निवडणूक आयोगाची चूक नाही तर मोठा घोटाळा आहे, असा आरोप उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला. त्यांनी ‘बोगस सरकार, बोगस मतदार’ या शीर्षकाखाली वरळी मतदारसंघाच्या मतदार यादीतील घोटाळ्यांची उदाहरणे दिली. मतदाराचे आडनाव वेगळे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगळे अशी ७२० नावे यादीत असल्याचे त्यांनी यावेळी दाखवले.
वरळीत विधानसभा निवडणुकीत १६,०४३ मतदार वाढले तर ५,६६१ जणांना यादीतून वगळले. या यादीचे वाचन केल्यानंतर १९,३३३ मतदारांच्या माहितीमध्ये गडबड असल्याचे आढळले. मतदार व वडिलांचे नाव एकच असलेले ५०२, एकाच ईपीआयसी क्रमांकाचे दोनवेळा नाव असलेले १३३ मतदार दिसले. ६४३ महिला मतदारांचे लिंग पुरुष म्हणून नोंदवले आहेत. हे सर्व पाहता वरळीमध्ये २२ हजाराहून अधिक मतदारांची नावे बनावट आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मिठाईच्या दुकानात दाखवले ४८ मतदार
वरळीत घसीटाराम हलवाई दुकानात ४८ मतदार दाखविले. दुकानाच्या नावावर रहिवासी म्हणून कोणाची नोंद करता येत नाही. मात्र हे दुकान दहा वर्षांपूर्वी तोडले असून तिथे एकही जण राहत नाही, असा दावा त्यांनी केला.
मतदार यादी क्रमांक १०८ मध्ये विठ्ठल झाड या मतदाराचे आणि वडिलांचे नाव एकच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मतदार व वडिलांचे एकच नाव असलेले वरळीत ५०२ मतदार आढळले.
शालिनी पार्टे यांचे २००० मध्येच निधन झाले. कृष्णा अडवाणी यांचे १९९५ मध्ये निधन झाले. मी पाच वर्षाचा असताना त्यांचे निधन झाले. पण मी आता ३२ वर्षाचा असताना आमदार झालो तेव्हा याच अडवाणी यांनी निवडणुकीत मतदान केले. अशा अनेक मतदारांच्या नावावर मतदान झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
लोकसभेत मृत, मात्र विधानसभेत झाला पुनर्जन्म
लोकसभेत नरहरी कुलकर्णी यांचे नाव यादीतून मृत दाखवून वगळले होते. मात्र, विधानसभेत त्यांनी त्याच नावाने पुनर्जन्म घेत निवडणुकीत मतदान केल्याचे आदित्य यांनी दाखवले. तपासणी केल्यावर त्यांचे निधन झाल्याचे आढळले. वरळीत ८५ हून अधिक वयाचे ११३ मतदार आहेत. त्यातील काही मतदारांचे २५ ते ३० वर्षांपूर्वी निधन होऊनही त्यांची नावे मतदार यादीत आहेत. त्यांच्या नावाने मतदानही झाले आहे, असे ते म्हणाले.