Join us  

'शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार, बियाणांच्या कंपन्यांना सोडणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 2:26 PM

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महाबीज कंपनीकडून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई - राज्यातील लॉकडाउन 30 जुनपर्यंत असून पुढे काय, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता. आता, जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगितली. 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज्यातील कोरोनाविरुद्धच्या लढाईबद्दल सांगतानाचा, राज्यातील शेतकऱ्यांची झालेली फसवणूकी सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणं विकणाऱ्या कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन उगवलंच नसल्याने शेतकरी अजूनच काळजीत पडला आहे. त्यात दुपार पेरणीचं संकट ओढवलं असून आता पेरणीसाठी खर्च कुठून करायचा, असा प्रश्नही बळीराजासमोर आहे. शेतकऱ्यांच्या या तक्रारीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

शेतकरी लॉकडाउनमध्येही मेहनत करतोय, आपल्यासाठी कष्ट घेतोय. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून अनेक तक्रारी आल्या आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून जास्त तक्रारी आल्या असून या तक्रारींची दखल आपण घेतली आहे. शेतकरी बांधवांना बोगस बियाणं देण्याचं पाप काही कंपन्यांकडून करण्यात आलंय. मर मर राबून, अफाट कष्ट करुन जे बियाणं त्यांनी पेरलं ते उगवलंच नाही. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलंय, पण पैसे कुठून आणायचं. आधीच लॉकडाउनमुळे कर्जमाफी थांबली आहे. मात्र, आता लवकरच उरलेली कर्जमाफी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

माझ्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांना मी सोडणार नाही. मी शेतकरी दादाला सांगू इच्छितो, तुम्ही काळजी करू नका. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला फसवलंय त्यांना कायद्याच्या कचाट्यात सजा दिल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, असे म्हणत बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांना उद्धव ठाकरेंना चांगलाच दम भरलाय. तसेच, या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळवून देणार, असे म्हणत हे सरकार आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठिशी असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

दरम्यान, राज्य सरकारचे मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे प्रमाण आता ५२.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर ४.५७ टक्के आहे. मात्र, अद्यापही मुंबई, पुणे, सोलापूर या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, कोरोनावर मात करत नेमकं कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपम मिशन बिगेन अगेन सुरु केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.  

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीशेतकरीलॉकडाऊन अनलॉक