Join us

नालेसफाईच्या पाहणीवेळी तुम्ही कुठे होता? शेलार यांचा आदित्य ठाकरे यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:11 IST

मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे आदित्य यांच्या पोटात दुखत आहे.

मुंबई : मुंबईत नालेसफाई कामांची पाहणी करून जिथे चुकीचे आढळले तिथे प्रशासनाला सवाल विचारले. मात्र, मुंबईचे लोकप्रतिनिधी असणारे आ. आदित्य ठाकरे नालेसफाई, रस्त्यांची कामे होत असताना कुठे होते? लंडनमध्ये थेम्स नदी आणि पॅरिसमध्ये सीन नदीची पाहणी करत होते का? असा सवाल करत मुंबईकरांची आम्ही प्रामाणिक सेवा करत आहोत आणि कायम करत राहणार, असे भाजप मुंबई अध्यक्ष व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर उद्धवसेनेची सत्ता होती. पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी आणलेला ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्प का पूर्ण होऊ शकला नाही? मिठी नदीच्या विकासासाठी एक हजार कोटी खर्चूनही नदीतला गाळ का काढला नाही? २६ जुलै २००५ च्या महाप्रलयावेळी उद्धव ठाकरे रस्त्यांवर उतरले होते का? याची उत्तरे आदित्य यांनी आधी द्यावीत, अशी टीका शेलार यांनी केली.   

मुंबईकरांच्या वाताहतीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. गेल्या २५ वर्षांत कंत्राटदारांशी कट कमिशन केल्यामुळेच मुंबईची अशी अवस्था झाली आहे. खालच्या अधिकाऱ्यांवर आयुक्त सर्व सोपवून विदेशात जात असतील तर ती त्यांचीही चूक आहे. प्रशासन चुकत असेल तिथे जाब विचारायला कचरत नाही. मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे आदित्य यांच्या पोटात दुखत आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात युटीलिटी सर्व्हिसच्या बांधकामाचा भाग तुटून पाणी आत शिरले, अशी माहिती एमएमआरसीएकडून देण्यात आली. तरीही याची सर्वंकष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटआशीष शेलारआदित्य ठाकरेमुंबईपाऊस