Ashok Kharat Case: कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? : राज ठाकरे, अशोक खरात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 05:37 IST2026-03-24T05:37:06+5:302026-03-24T05:37:36+5:30
राज ठाकरे यांनी संत परंपरेपासून लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांच्या विचारपरंपरेची आठवण करून दिली.

Ashok Kharat Case: कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? : राज ठाकरे, अशोक खरात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक तपशीलांवर तीव्र संताप व्यक्त करत राज्यातील राजकीय व सामाजिक अधःपतनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले की, अशोक खरात प्रकरणातील हिडीस तपशील वाचून ‘शब्दशः गरगरल्यासारखं’ होते. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेशी आजच्या वास्तवाची तुलना केली आणि महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ असा प्रश्न पडत असल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाकरे यांनी संत परंपरेपासून लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांच्या विचारपरंपरेची आठवण करून दिली. अशा राज्यात अंधश्रद्धा व चमत्कारांच्या नावाखाली राजकारणी व्यक्तींच्या मागे लागणे हे ‘भीषण’ असल्याचे नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित करणाऱ्या विधानसभेतील अनेक आमदारांवरच या प्रकरणात संशय व्यक्त होत असल्याचा विरोधाभासही त्यांनी अधोरेखित केला. “सत्तेसाठीची धडपड, पदासाठीचे राजकारण आणि निष्ठा विकण्याची प्रवृत्ती यामुळेच अशा प्रवृत्तींना खतपाणी मिळत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “प्रकरण घडत असताना त्याचा सुगावा का लागला नाही?”
माध्यमांनी पाठपुरावा सुरू ठेवून पर्दाफाश करावा
माध्यमांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवावा, तसेच अशा बुवाबाबांच्या कृत्यांचा पर्दाफाश करावा, असे आवाहन करत ठाकरे यांनी दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ न देण्याची मागणी केली. राज्यात वाढत्या महिला शोषण, अपहरण आणि अमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष वेधत, “दैवी शक्तीच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण होत असेल तर त्याहून गंभीर काहीच नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.